हडपसरची वाहतूक कोंडी फुटणार, अजित पवारांनी नवा प्लॅन केला जाहीर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुण्यात 39 किमीच्या 6 पदरी उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हडपसर ते यवत या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नव्या प्लॅननुसार हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून उड्डाणपूल सुरू होईल आणि तो थेट यवतपर्यंत सहा पदरी स्वरूपात जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे. 39 किमीच्या 6 पदरी उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. पूर्वीच्या नियोजन उड्डाणपुलाच्या सुमारे 4.5 किलोमीटर जास्तला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
पुणे शहरातून सोलापूरकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 65 वरून जावे लागते. हडपसर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळे येथे वाहतूक वाढली आहे. सोलापूरहून शहरात येणारी किंवा पुण्यातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी हडपसरऐवजी आता भैरोबा नाला येथून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे साडेचार किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर करण्यात येणार असून कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे असणार आहे.
advertisement
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार माहिती देताना म्हणाले, पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यावर आपल्या सरकारचा भर आहे. पुणे ते सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आधीच्या प्लॅनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यासंदर्भात नव्या प्रस्तावाला मुख्यमंत्री महोदयांनी मंजुरी दिली आहे. नव्या प्लॅननुसार हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून उड्डाणपूल सुरू होईल आणि तो थेट यवतपर्यंत सहा पदरी स्वरूपात जाणार आहे. सदर काम लवकरात लवकर मार्गी लागेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
advertisement
प्रकल्पातील महत्त्वाचे बदल
भैरोबा नाला ते यवत या नव्या मार्गामुळे उड्डाणपूल मार्गाची लांबी आता अंदाजे 39 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. आधीचा हडपसर–यवत हा सुमारे 34.5 किलोमीटरचा प्रस्ताव होता, त्यामुळे जवळपास साडेचार किलोमीटरचा अतिरिक्त विस्तार होत आहे. लांबी वाढल्यामुळे आधी मंजूर केलेल्या 5,262 कोटी रुपयांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यताही आहे. हा प्रकल्प बीओटी पद्धतीने उभारला जाणार असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली सुरू होईल. निविदा प्रक्रिया झाल्यावर तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 12, 2025 8:41 PM IST








