Pune IT Park: हिंजवडीतील कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी सरकारचं पाऊल; पुरंदर आयटी पार्कबद्दल मोठी अपडेट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. हेच स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे.
पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. हेच स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. हिंजवडीला पर्याय म्हणून पुरंदर येथे भव्य आयटी पार्क उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
पुरंदरमध्ये 572 हेक्टरवर आयटी पार्क?
पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी परिसरातील ५७२ हेक्टर गायरान जमीन आयटी पार्कसाठी वापरण्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे. याबाबत सदस्य विजय शिवतारे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, महसूल विभागाकडून जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) सोपवण्यात येईल.
advertisement
प्रकल्पामुळे खर्चात होणार बचत
या जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे. ही जमीन प्रामुख्याने शासनाची महसुली जमीन असल्याने प्रकल्पासाठी जमिनीच्या संपादनाचा खर्चही कमी होणार आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही चर्चेत सहभाग घेत सांगितले की, भौगोलिकदृष्ट्या पुरंदर हा आयटी हबसाठी उत्तम पर्याय आहे.
हिंजवडीतील कंपन्यांचे स्थलांतर थांबणार?
गेल्या काही काळापासून हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटी क्षेत्रात नाराजी आहे. काही मोठ्या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळल्याच्या बातम्या येत असतानाच सरकारने पुरंदरचा पर्याय पुढे आणला आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच या नवीन आयटी पार्कचे काम तातडीने सुरू केले जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 9:03 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune IT Park: हिंजवडीतील कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी सरकारचं पाऊल; पुरंदर आयटी पार्कबद्दल मोठी अपडेट









