Ashadhi Wari 2025: वारीत वारकरी इतके आनंदी का असतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीला लाखो वारकरी पंढरीला येत असतात. सर्वसामान्यांपेक्षा हे वारकरी अधिक आनंदी असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे.
पुणे : “जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेचि विसावा” या भक्तिभावाने हजारो नव्हे, लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होतात. ही यात्रा केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती आध्यात्मिक समाधान, सामाजिक समता आणि आंतरिक शांती यांचा संगम आहे. याच वारीतील वारकऱ्यांचा ‘आनंद निर्देशांक’ म्हणजेच ‘Happiness Index’ अभ्यासणारा भारतातील पहिलाच शास्त्रीय अभ्यास नुकताच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सादर झाला. वारीत सहभागी होणारे वारकरी हे इतर सर्व घटकांपेक्षा अधिक आनंदी असल्याचे निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे.
मूळचे सोलापूरचे असणारे प्रा. डॉ. गणेश टेकळे यांनी सादर केलेल्या ‘Study of Happiness Index of Warkari in Maharashtra’ या अभ्यासात महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा आणि त्यांच्या आनंद निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी पुरुष, महिला आणि अगदी तृतीयपंथी वारकऱ्यांकडूनही माहिती घेतली. डॉ. गणेश यांनी ‘कॅन्ट्रिल स्केल’सह एकूण 13 आयाम (domains) आणि 65 निर्देशकांवर (indicators) आधारित विश्लेषण केले. यामध्ये जीवन समाधान, मानसिक आरोग्य, सामाजिक सहकार्य, समुदाय भावना, कला-संस्कृती, पर्यावरण, शासन व आर्थिक स्थैर्य यांचा समावेश आहे.
advertisement
जगभरातील आनंद निर्देशांकात 147 देशांपैकी भारताचा क्रमांक 118 वा आहे. तुलनेत, सामान्य भारतीय नागरिकांचा आनंद निर्देशांक 0.438 इतका असताना, वारकऱ्यांचा आनंद निर्देशांक 0.511 नोंदवण्यात आला आहे. म्हणजेच, वारकरी हे सरासरी भारतीयांपेक्षा अधिक समाधानी आणि आनंदी असल्याचे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झाले आहे.
advertisement
डॉ. टेकळे सांगतात, “वारी, विठोबा दर्शन, एकादशी आणि सामूहिक साधना या गोष्टी वारकऱ्यांना मानसिक बळ आणि आत्मिक समाधान देतात. ते जे काम करतात त्यात पूर्णपणे तल्लीन असतात. ते मानतात, ‘मी जे करतो, ते विठ्ठलासाठीच’, म्हणूनच त्यांचा आनंद अधिक असतो. तसेच आध्यात्मिक जीवनशैली, शाकाहार, साधे पण समाधानी राहणीमान, नियमित विठ्ठल भक्ती यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक संतुलन अधिक चांगले राहते. धावपळीच्या जीवनातही ते भक्तीला वेळ देतात, त्यातून त्यांना स्थिरता आणि आनंद मिळतो.”
advertisement
दरम्यान, वारकऱ्यांचा हा अभ्यास Happiness Economics आणि Behavioural Economics या क्षेत्रांत एक महत्त्वपूर्ण योगदान ठरतो. डॉ. टेकळे यांच्या मते, सरकार आणि धोरणकर्त्यांनी भविष्यात समाजधोरण आखताना अशा आध्यात्मिक-सांस्कृतिक चळवळींचा अभ्यास आणि समावेश करणे आवश्यक आहे. वारी ही केवळ परंपरा नाही, तर ती एक आनंदाची वाटचाल आहे, अशी भावना संशोधकांनी अभ्यासातून अधोरेखित केली आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Jul 05, 2025 3:20 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: वारीत वारकरी इतके आनंदी का असतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर








