Holi 2026: पेटवलेल्या होळीच्या भोवती किती परिक्रमा घालाव्या? अग्निची पूजा करताना या गोष्टी चुकवू नका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Holika dahan parikrama 2026 : महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि परंपरेने साजरा केला जातो. वाईटाचा नाश करून सत्याचा विजय मिळवण्यासाठी गावागावात आणि गल्लोगल्ली होळी पेटवली जाते. होळीच्या पूजेचं पूर्ण फळ मिळवण्यासाठी...
मुंबई : आपल्या महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि परंपरेने साजरा केला जातो. वाईटाचा नाश करून सत्याचा विजय मिळवण्यासाठी गावागावात आणि गल्लोगल्ली होळी पेटवली जाते. होळीच्या पूजेचं पूर्ण फळ मिळवण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी येण्यासाठी काही पारंपरिक नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असतं.
पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री होळी पेटवली जाईल. संध्याकाळी 5:55 वाजल्यापासून भद्रकाळ सुरू होणार असून तो 3 मार्चच्या पहाटे 4:28 वाजेपर्यंत असेल. यंदा भद्रा पृथ्वीलोकात मानली जात असल्यामुळे प्रदोष काळात म्हणजे सांजवेळी होळीचं पूजन आणि दहन करणं सर्वात उत्तम ठरेल. या दिवशी गरजूंना दान देणं खूप पुण्याचं मानलं जातं.
होळी पेटवण्यापूर्वी तिची मनोभावे पूजा करावी. होळीला सुती धागा गुंडाळत 5 ते 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. होळीच्या अग्नीमध्ये नारळ, अक्षता आणि जवस अर्पण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. महाराष्ट्रात होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा मान असतो, त्यामुळे 'होळी रे होळी, पूर्णाची पोळी' असं म्हणत होळीला नैवेद्य दाखवून मगच ती पेटवली जाते.
advertisement
होळीच्या वेळी पांढऱ्या, पिवळ्या किंवा लाल रंगाचे साधे सुती कपडे घालणं शुभ मानलं जातं. या दिवशी चामड्याचे बेल्ट, पाकीट किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते असं मानलं जातं.
अनेक ठिकाणी होळी पेटवून लोक लगेच घरी परततात, पण तसं करू नये. होळीच्या अग्नीजवळ थोडा वेळ थांबून तिची ऊब घ्यावी. असं मानलं जातं की होळीच्या अग्नीत एक विशेष शक्ती असते, जी आपल्या शरीरातील आणि मनातील नकारात्मकता नष्ट करते. दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख (विभूती) घरी आणून ती कपाळाला लावणं आणि घराच्या कोपऱ्यात शिंपडणं वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.
advertisement
होळीचा दिवस हा घरात शांती आणि समृद्धी मागण्याचा असतो. या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करणं पूर्णपणे टाळावं. तामसी अन्न घेतल्यामुळे धनहानी किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, असं जुने जाणकार सांगतात. त्यामुळे या दिवशी सात्विक आहार घेणं हितकारक असतं. नकारात्मक शक्तींचा प्रभाव टाळण्यासाठी महिलांनी होळीच्या पूजेच्या वेळी आपले केस मोकळे सोडू नयेत. केस व्यवस्थित बांधून पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, अशी धारणा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 11:55 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Holi 2026: पेटवलेल्या होळीच्या भोवती किती परिक्रमा घालाव्या? अग्निची पूजा करताना या गोष्टी चुकवू नका










