नल आणि नील यांना का दिलं जातं रामसेतू बांधण्याचं श्रेय? त्यांनी असं काय केलं?
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
वानरसेनेतले दोन इंजिनीअर अर्थात नल आणि नील या वानरांनी रामसेतू बांधला नसता तर प्रभू श्रीरामाला आपलं सैन्य लंकेपर्यंत पोहोचवणं कठीण झालं असतं.
मुंबई : दोन वानरांना ऋषींनी दिलेला शाप त्यांच्यासाठी नंतर वरदान ठरला. या माध्यमातून त्यांनी एक पूल बांधला. त्यावरून प्रभू श्रीरामाचं सैन्य समुद्र पार करुन लंकेत पोहोचू शकलं आणि तिथे त्यांनी रावणाच्या सैन्याचा पराभव केला. हे दोन खोडकर वानर नसती तर प्रभू श्रीरामाच्या सैन्याला लंकेत पोहोचणं कठीण झालं असतं. हे दोन वानर कोण होते आणि संकटकाळात प्रभू श्रीरामासाठी ते संकटमोचक इंजिनीअर कसे बनले, तसंच ते एवढं मोठं बांधकाम पुन्हा का करू शकले नाहीत, याविषयी तुम्हाला माहिती आहे का?
वानरसेनेतले दोन इंजिनीअर अर्थात नल आणि नील या वानरांनी रामसेतू बांधला नसता तर प्रभू श्रीरामाला आपलं सैन्य लंकेपर्यंत पोहोचवणं कठीण झालं असतं. नल आणि नील हे दोघेही रामायण काळातले महान अभियंते होते. पाहणी आणि सर्वेक्षणानंतर त्यांनी समुद्रात दगड टाकून हा पूल बांधला. रावणाच्या पराभवानंतर प्रभू श्रीरामाच्या वानरसेनेचं युद्ध संपलं तेव्हा या दोघांनी काय केलं?
advertisement
सॅटेलाइट्सच्या निरीक्षणांनुसार आणि सध्याच्या तपासण्यांसोबतच शास्त्रज्ञ असं सांगतात, की रामेश्वरपासून श्रीलंकेपर्यंत पूल बांधण्यात आला होता. कारण समुद्राच्या पाण्याखाली दगडांची एक मोठी रेषा लंकेपर्यंत पोहोचताना दिसत होती. हा पूल कित्येक किलोमीटर लांबीचा होता. त्या वेळी इंजिनीअरिंगचं शिक्षण नव्हतं. मग नल आणि नील या दोन वानरांनी हे कसं साध्य केलं? या वानरांचे पिता विश्वकर्मा असल्याचं मानलं जात होतं. विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार आणि बांधकामातले तज्ज्ञ मानले जातात.
advertisement
नल आणि नील कोण होते?
हिंदू महाकाव्य असलेल्या रामायणात नील याला नीला असंही संबोधलं गेलं आहे. तो प्रभू श्रीरामाच्या सेनेतला एक वानर सरदार होता. तो सुग्रीव राजाच्या नेतृत्वाखालच्या वानरसेनेचा प्रमुख सेनापती होता. प्रभू श्रीरामाने रावणाविरुद्ध जे युद्ध केलं, त्यात नील याने वानरसेनेचं नेतृत्व केलं.
प्रभू श्रीराम समुद्रावर नाराज का झाले होते?
वाल्मिकी रामायणातल्या उल्लेखानुसार, जेव्हा प्रभू श्रीराम समुद्राला रस्ता देण्याची विनंती करत होते, तेव्हा त्यावर समुद्र कोणताच प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे प्रभू श्रीराम नाराज झाले. त्यामुळे त्यांनी समुद्रावर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे समुद्र कोरडा पडू लागला. तेव्हा वरुण पुढे आला आणि म्हणाला, की तुमच्या सैन्यात दोन असे वानर आहेत, जे पूल बांधू शकतात. ते या कलेत निपुण आहेत. त्यांनी समुद्रावर दगड ठेवला तर तो बुडणार नाही.
advertisement
नल आणि नील या दोघांनी कसा पूल बांधला?
नल आणि नील हे विश्वकर्माचे पुत्र असल्याने त्यांना वास्तुरचनेचं ज्ञान होतं. त्यामुळे त्यांनी पूल बांधायला सुरुवात केली. वानरसेना नल आणि नील यांना श्रीराम असं लिहून दगड देत होती. हे दगड समुद्राच्या पाण्यात बुडत नव्हते. या दोन्ही भावांनी लंकेपर्यंत अशाच पद्धतीने हा पूल बांधला. हा पूल बांधण्यासाठी दगडांसह झाडांच्या जाड फांद्यांचा वापर केला गेला.
advertisement
30 मैलावर पाच दिवसांत बांधला पूल
नल आणि नील यांनी 30 मैलांचा पूल म्हणजे दहा किलोमीटरचा पूल पाच दिवसांत बांधून पूर्ण केला. त्यानंतर प्रभू श्रीराम आणि त्यांची संपूर्ण सेना या पुलावरून लंकेत पोहोचली. युद्ध जिंकल्यानंतर ही सेना याच पुलावरून परत आली. तथापि, रामायणाच्या काही आवृत्त्यांमध्ये, पूल बांधण्याचं मुख्य श्रेय नलाला दिलं गेलं असून, नील हा त्याचा मुख्य सहायक असल्याचं वर्णन केलं आहे. काही आवृत्त्यांमध्ये या दोन्ही भावांनी मिळून हा पूल बांधल्याचं सांगितलं आहे.
advertisement
एक शाप बनला वरदान
नल आणि नील हे लहानपणापासून खोडकर होते. ते ऋषींनी पूजा केलेल्या मूर्तींवर पाणी घालत असत. यावर उपाय म्हणून ऋषींनी त्यांना एक शाप दिला. ते पाण्यात ज्या वस्तू टाकतील त्या बुडणार नाहीत, असा तो शाप होता; पण ऋषींचा हा शाप त्यांच्यासाठी वरदान ठरला.
श्री हनुमान का नाराज झाले?
रामसेतू बांधताना श्री हनुमान या दोन्ही वानरांवर नाराज झाले होते. तेलुगू आणि बंगाली भाषेतलं रामायण, तसंच जावानीज छाया नाटकानुसार, नल अशुद्ध असलेल्या डाव्या हाताने श्री हनुमानाने आणलेले दगड घेत असून, ते समुद्रात फेकण्यासाठी शुद्ध मानल्या जाणाऱ्या उजव्या हाताचा वापर करत असल्याचं पाहून श्री हनुमान नाराज झाले. तेव्हा प्रभू श्रीरामाने श्री हनुमानाची समजूत काढली. कामगारांची परंपरा डाव्या हाताने वस्तू घेणं आणि ती उजव्या हाताने ठेवणं अशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
लंकेत सेनेसाठी बांधली घरं
कंब रामायणानुसार, नल याने लंकेत प्रभू श्रीरामाच्या सेनेला राहण्यासाठी अनेक तात्पुरती घरं बांधली. नल याने रामसेनेसाठी सोनं आणि रत्नांचे तंबू उभारून एक गाव वसवलं. तसंच स्वतःसाठी बांबू, लाकूड आणि गवताच्या गंजीपासून एक साधं घर बांधलं.
नल आणि नील यांनी युद्धदेखील केलं
रावण आणि त्याच्या राक्षस सेनेविरुद्ध प्रभू श्रीरामाच्या नेतृत्वाखाली नल आणि नील या दोघांनी युद्धातही भाग घेतला. रावणाचा मुलगा मेघनाद याच्या बाणानं नल गंभीर जखमी झाला; पण तो यातून बचावला आणि त्याने अनेक राक्षसांचा वध केला.
युद्धानंतर त्यांनी केलं?
युद्धानंतर नल आणि नील हे सुग्रीवाचे मंत्री बनले. ते राज्यात घरबांधणी व्यवस्थापन पाहू लागले. त्यांनी नंतरच्या आयुष्यात वास्तुविशारद म्हणून कोणतंही मोठं काम केलं नसलं, तरी मंत्री म्हणून त्यांनी सुग्रीवाला सातत्याने उपयुक्त सल्ले दिले. जेव्हा प्रभू श्रीरामाने अयोध्येत अश्वमेध यज्ञ केला, तेव्हा नल आणि नील दोघेही अश्वरक्षणासाठी त्यांच्यासोबत जात असतं. काही ठिकाणी नील हा विश्वकर्माचा मुलगा असल्याचं सांगितलं गेलं आहे, तर नल हा त्याचा सहायक असल्याचा उल्लेख आहे. काही ठिकाणी हे दोघं भाऊ असल्याचं सांगितलं गेलं आहे.
रावणाविरुद्धच्या युद्धानंतर नल आणि नील प्रामुख्याने किष्किंधेचा राजा सुग्रीवासोबत प्रशासकीय काम करत राहिले. अयोध्येला महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी, तसंच प्रभू श्रीरामाला भेटायला जात असत; पण त्यांनी उर्वरित जीवनात रामसेतूसारखी अद्भुत वास्तू पुन्हा बांधली नाही.
हा पूल मन्नारच्या खाडीला पाल्क सामुद्रधुनीपासून वेगळं करतो. 15व्या शतकापर्यंत लोक या पुलावरून पायी प्रवास करायचे असं म्हणतात. नंतर वादळामुळे हा पूल समुद्रात खोल गेला; पण चक्रीवादळामुळे तो उद्ध्वस्त झाला नसल्याचं सांगितलं जातं. या पुलाचा प्रथम उल्लेख वाल्मिकी रामायणात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 14, 2024 10:21 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नल आणि नील यांना का दिलं जातं रामसेतू बांधण्याचं श्रेय? त्यांनी असं काय केलं?











