Ajinkya Rahane : निवड समितीसाठी रहाणेला हवा नवा नियम, लागू झाल्यास जाणार आगरकरची खूर्ची!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मागच्या काही काळापासून भारतीय टीममधून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला निवड समितीच्या नियुक्तीसाठी नवीन नियम हवा आहे.
मुंबई : मागच्या काही काळापासून भारतीय टीममधून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला निवड समितीच्या नियुक्तीसाठी नवीन नियम हवा आहे. अलिकडेच निवृत्त झालेल्या खेळाडूंना निवड समिती सदस्य म्हणून नियुक्त केलं पाहिजे, अशी मागणी अजिंक्य रहाणेने केली आहे. नुकत्याच निवृत्त झालेल्या खेळाडूंना टीम आणि खेळाडूंबद्दल अधिक माहिती असते, असं रहाणे म्हणाला आहे. सध्याचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर 2013 साली क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. जर हा नियम लागू झाला, तर त्यांना पदावरून जावं लागेल. रहाणेने मात्र हा नियम स्थानिक क्रिकेटमध्ये लागू केला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
काय आहे सध्याची पॉलिसी?
सध्या 10 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेला कोणताही क्रिकेटपटू राज्याच्या निवड समितीचा सदस्य होण्यासाठी अर्ज करू शकतो, पण त्याच्या निवृत्तीला किमान 5 वर्ष झाली पाहिजेत, असा नियम आहे. पण रहाणेच्या मते निवड समिती सदस्याची मानसिकता आणि त्याचा दृष्टिकोन सध्याच्या क्रिकेटसोबत जुळला पाहिजे.
पुजाराच्या चॅनलवर आला रहाणे
advertisement
चेतेश्वर पुजाराच्या युट्यूब चॅनलवर अजिंक्य रहाणे बोलत होता. 'खेळाडूंनी निवड समिताला घाबरू नये, मला निवड समितीबद्दल बोलायचं आहे, खासकरून देशांतर्गत क्रिकेटमध्ये. आपल्याकडे असे निवड समिती सदस्य असले पाहिजेत, जे अलीकडेच उच्च-स्तरीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. क्रिकेट ज्या पद्धतीने विकसित होत आहे, त्यामुळे निवड समितीची मानसिकता आणि विचारसरणी बदलांशी जुळवून घेणारी पाहिजे. खेळ विकसित होत आहे, 20-30 वर्षांपूर्वी क्रिकेट कसे खेळले जात होते, यावर आधारित निर्णय आपण आता घेऊ शकत नाही', असं रहाणे म्हणाला आहे.
advertisement
आधुनिक क्रिकेट समजून घेणं महत्वाचे
'टी-20 आणि आयपीएलसारख्या फॉरमॅटमध्ये आधुनिक क्रिकेटपटूंची शैली समजून घेणं महत्त्वाचं आहे. शक्य तेवढे निवड समिती सदस्य सर्व राज्यांमधून असले पाहिजेत, खेळाडूंनी मुक्तपणे आणि निर्भयपणे क्रिकेट खेळलं पाहिजे', अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली. चेतेश्वर पुजारा रहाणेच्या या मताशी अंशतः सहमत होता, पण या मुद्द्यावर त्याने अधिक संतुलित मत मांडले.
advertisement
पुजारा काय म्हणाला?
'मोठ्या राज्यांसाठी हा नियम लागू केला जाऊ शकतो, कारण त्यांच्याकडे खूप पर्याय आहेत, पण माजी क्रिकेटपटू खूप आधी निवृत्त झाला आहे, ज्याचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहेत आणि त्याला निवड समितीमध्ये यायचं असेल, तर त्याला तुम्ही संधीपासून वंचित ठेवू शकणार नाही', असं मत पुजाराने मांडलं. भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड करताना स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीला महत्त्व दिलं पाहिजे, असंही रहाणे आणि पुजाराने सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 11:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ajinkya Rahane : निवड समितीसाठी रहाणेला हवा नवा नियम, लागू झाल्यास जाणार आगरकरची खूर्ची!