IND vs PAK : फायनलमध्ये पाकिस्तानचा नीचपणा, भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना आफ्रिदी-राऊफचं संतापजनक कृत्य
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवर रोमांचक विजय झाला आहे. यंदाच्या आशिया कपमधला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा 3 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे.
मुंबई : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवर रोमांचक विजय झाला आहे. यंदाच्या आशिया कपमधला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा 3 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तानच्या तीनही सामन्यांमध्ये मोठे वाद झाले. आशिया कप फायनलच्या सुरूवातीलाच पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या कृत्यामुळे भारतीय चाहते संतप्त झाले आहेत. टॉस झाल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू मैदानात राष्ट्रगीतासाठी आले. भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना शाहीन आफ्रिदी आणि हारिस राऊफ हे दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसले.
पाकिस्तानने दाखवला नाही राष्ट्रगीताला आदर
नियमांनुसार, पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजत असताना भारतीय टीम शांतपणे आणि आदराने उभी राहिली. पण भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना पाकिस्तानी खेळाडूंनी मात्र मर्यादा ओलांडली. शाहीन आफ्रिदी आणि हारिस राऊफच्या या कृत्यानंतर भारतीय चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
टॉसवेळीही वाद
याआधी आशिया कपच्या फायनलवेळी टॉसदरम्यानही वाद निर्माण झाला होता. टॉसच्या वेळी दोन ब्रॉडकास्टर उपस्थित होते. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने भारतीय ब्रॉडकास्टर रवी शास्त्री यांच्यासोबत बोलण्यास नकार दिला, त्यामुळे टॉसवेळी रवी शास्त्रींसोबत वकार युनूसही मैदानात आला. रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवला तर वकार युनूसने सलमान आघाला प्रश्न विचारले.
advertisement
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताने पाकिस्तानला 19.1 ओव्हरमध्ये 146 रनवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानचा स्कोअर 113 वर 2 एवढा होता, पण पुढच्या 8 विकेट त्यांनी फक्त 33 रनवर गमावल्या. पाकिस्तानने दिलेल्या 147 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवातही खराब झाली. भारताच्या पहिल्या 3 विकेट 20 रनवरच गेल्या होत्या. पण तिलक वर्माने आधी संजू सॅमसन आणि मग शिवम दुबेच्या मदतीने भारताचा डाव सावरला. तिलक वर्माने 53 बॉलमध्ये नाबाद 69 रनची खेळी केली. तर शिवम दुबेने 22 बॉलमध्ये 33 आणि संजूने 21 बॉलमध्ये 24 रन केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 5:31 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : फायनलमध्ये पाकिस्तानचा नीचपणा, भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना आफ्रिदी-राऊफचं संतापजनक कृत्य