Asia Cup : टीम इंडियाचा ट्रिपल धमाका, पण नवख्या ओमानने भारतीय बॉलरना दमवलं, पाकिस्तानलाही लाजवलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये टीम इंडियाने लागोपाठ तिसरा विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भारताने ओमानचा 21 रननी पराभव केला आहे.
अबू धाबी : आशिया कपमध्ये टीम इंडियाने लागोपाठ तिसरा विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भारताने ओमानचा 21 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या 189 रनचा पाठलाग करताना ओमानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 167 रन केल्या, पण या सामन्यात ओमानने भारतीय बॉलरना चांगलंच दमवलं. ओपनर आमिर कलीमने 46 बॉलमध्ये 64 तर हमाद मिर्झाने 33 बॉलमध्ये 51 रनची खेळी केली. ओमानचे ओपनर जतिंदर सिंग आणि आमिर कलीम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 56 रनची पार्टनरशीप झाली. आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशाविरोधात ओमानने पहिल्यांदाच पॉवर प्ले मध्ये एकही विकेट गमावली नाही. भारताकडून हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि हर्षीत राणा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
ओमानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 रन केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 56 रन केले, तर अभिषेक शर्माने 253.33 च्या स्ट्राईक रेटने 15 बॉलमध्ये 38 रनची वादळी खेळी केली. अभिषेक शर्माच्या इनिंगमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय अक्षर पटेलने 13 बॉलमध्ये 26 आणि तिलक वर्माने 18 बॉल 29 रन केले. ओमानकडून शाह फैजल, जितेन रामानंदी आणि आमीर कलीम यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.
advertisement
टीम इंडिया सुपर-4 मध्ये
टीम इंडियाने आधीच आशिया कपच्या सुपर-4 मध्ये धडक मारली आहे, त्यामुळे ओमानविरुद्धचा हा सामना टीम इंडियासाठी सराव म्हणून पाहिला जात आहे. सुपर-4 मध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचं आहे. सुपर-4 मध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 21 सप्टेंबरला, बांगलादेशविरुद्ध 24 सप्टेंबरला आणि श्रीलंकेविरुद्ध 26 सप्टेंबरला होणार आहे. सुपर-4 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या 2 टीम 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 12:04 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : टीम इंडियाचा ट्रिपल धमाका, पण नवख्या ओमानने भारतीय बॉलरना दमवलं, पाकिस्तानलाही लाजवलं!