Asian Games : शेवटच्या दोन मिनिटात वाद, अर्धा तास खेळ थांबला; अखेर भारताने जिंकलं सुवर्ण
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या कबड्डीमध्ये अंतिम सामन्यात भारताने इराणला ३३-२९ अशा फरकाने हरवलं. याआधी महिला कबड्डी संघाने तैवानला हरवून सुवर्णपदक मिळवलं होतं.
हाँगझोऊ, 07 ऑक्टोबर : भारतीय पुरुषांच्या कबड्डी संघाने एशियन गेम्स २०२३ मध्ये सुवर्णपदक पटकावलं. अंतिम सामन्यात भारताने इराणला ३३-२९ अशा फरकाने हरवलं. याआधी महिला कबड्डी संघाने तैवानला हरवून सुवर्णपदक मिळवलं होतं. भारतीय संघाचं हे १०३ वे पदक आहे. शनिवारी भारताने ८ पदके पटकावली असून यात ६ सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे. दोन सुवर्णपदकं कबड्डीत तर ४ इतर पदके तिरंदाजीत मिळाली आहेत. बॅडमिंटन आणि क्रिकेटमध्येही एक-एक सुवर्णपदक खात्यात जमा झाले आहे. आतापर्यंत २८ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४० कांस्य पदके मिळाली आहेत.
फायनलमध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाची सुरुवात चांगली होऊ शकली नव्हती. इराणने जबरदस्त कामगिरी करताना ३-१ अशा फरकाने आघाडी घेतली होती. यानंतर स्कोअर ५-५ असा बरोबरीत झाला. इराणने नंतर सलग गुण मिळवत ९-६ ने आघाडी घेतली. तर भारतानेही जबरदस्त मुसंडी मारली. हाफ टाइमपर्यंत भारताने १७-१३ अशी आघाडी घेतली होती. इराणचा संघ ऑलआऊट झाला होता.
advertisement
भारताने दुसऱ्या हाफमध्येही चांगली सुरुवात करत २०-१६ असा स्कोअर केला. यानंतर २४-१९ इतका झाला. त्यानंतर इराणने आख्रमक खेळ करत भारताला ऑलआऊट करत बरोबरी साधली. पण भारताने पुन्हा जोरदार खेळ करत २८-२५ अशी आघाडी घेतली. मात्र इराणने पिछाडी भरून काढत बरोबरी साधली. यानंतर पॉइंटवरून वाद झाल्याने खेळ जवळपास अर्धा तास थांबला होता.
advertisement
सामना संपण्यास २ मिनिटे वेळ राहिला होता. त्यावेळी सुरुवातीला भारताला ३ तर इराणला एक गुण दिला गेला. याला इराणने विरोध केला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यानंतर भारतीय खेळाडू कोर्टवरच ठाण मांडून बसले तेव्हा खेळ थांबवण्यात आला. पुन्हा भारताच्या बाजूने निर्णय दिला गेला. भारताला तीन गुण दिले गेले. तर पुन्हा इराणने विरोध केला. शेवटी वादानंतर खेळ सुरू झाला आणि भारताने विजय मिळवला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2023 4:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : शेवटच्या दोन मिनिटात वाद, अर्धा तास खेळ थांबला; अखेर भारताने जिंकलं सुवर्ण