Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी आलेली गर्दी हटेना; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Team India Victory Parade Updates : टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली आहे. थोड्याच वेळात खेळाडूंची विजयी रॅली निघणार आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ T20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतला आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर संघ मुंबईत दाखल झाला आहे. नरिमन पॉईंट आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह अक्षरशः जनसागर लोटला आहे. पाऊस सुरू असतानाही चाहत्यांमधील उत्साह तसूभरही कमी होताना दिसत नाही. खेळाडूंची बस वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहचवणे हे पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे. अशातच गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे.
गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज!
टीम इंडियाच्या विजयाची रॅली आज नरिमन पॉइंट येथे निघणार असून नरिमन पॉइंट्स येथील रस्ते क्रिकेट प्रेमींनी भरून गेले आहेत. अशातच एका हॉटेल बाहेर टीम इंडिया उतरणार असून या हॉटेल बाहेर क्रिकेट प्रेमी खचखचून भरलेत. आपला आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी येथे प्रचंड गर्दी केली असून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
advertisement
मरीन ड्राईव्ह परिसरात एवढा जनसागर लोटला आहे की रोड शोसाठी जी बस वापरण्यात येणार आहे तीच बस गर्दीत अडकली आहे. याच बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे. मुंबईमध्ये पाऊस पडत असतानाही चाहते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई विमानतळावर आल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या विमानाला फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी पाणी उडवून सलामी दिली आहे.
advertisement
खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. तेव्हापासून भारतीय चाहते चॅम्पियन संघाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. मायदेशी परतल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. टीम इंडियाचा रोड शो झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भारतीय खेळाडूंना 125 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठीही वानखेडे स्टेडियम अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये हाऊसफुल झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 04, 2024 7:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी आलेली गर्दी हटेना; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय