IPL 2025 : रहाणेवर अन्याय झाला, शेवटच्या क्षणी नियम बदलल्याने KKR नाराज, थेट बीसीसीआयकडे तक्रार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 साठी बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियमांमध्ये बदल केला आहे, यामुळे केकेआरने उघडपणे नाराजी व्यक्त करत बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
मुंबई : आयपीएल 2025 मधल्या उरलेल्या सामन्यांमध्ये पावसाचा धोका लक्षात घेता बीसीसीआयने नियमांमध्ये बदल केला आहे. आता संपूर्ण 20-20 ओव्हरची मॅच सुरू व्हायला 120 मिनिटांचा अधिकचा वेळ दिला गेला आहे, आधी हीच वेळ 60 मिनिटांची होती, पण बीसीसीआयने अचानक बदलेल्या या नियमामुळे केकेआरने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचं पत्र केकेआरने बीसीसीआयला मेल करून लिहिल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे.
'मोसमाच्या मध्यातच परिस्थितीमुळे नियम बदलणं गरजेचं असेल, पण या नियमांची अमंलबजावणी करताना सातत्य अपेक्षित आहे', असं पत्र केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनी आयपीएलचे सीओओ हेमांग अमिन यांना लिहिलं आहे. हा नियम आधीच लागू केला असता तर 17 मे रोजीची आरसीबी आणि केकेआर यांच्यातल्या मॅचलाही अधिकचा वेळ मिळाला असता आणि पाच-पाच ओव्हरचा सामना होऊ शकला असता, अशी केकेआरची भूमिका आहे.
advertisement
'आयपीएल 17 मे पासून पुन्हा सुरू झाली, त्याआधीच बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. 120 मिनिटांचा नियम आधीच लागू केला असता तर आरसीबी आणि केकेआर यांच्यात 5-5 ओव्हरची मॅच होऊ शकली असती', असं म्हणत केकेआरने नाराजी व्यक्त केली आहे.
आरसीबी आणि केकेआर यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाल्याने केकेआरचं प्ले-ऑफचं आव्हान संपुष्टात आलं. केकेआरकडे सध्या 13 सामन्यांमध्ये 12 पॉईंट्स आहेत, त्यामुळे ते जास्तीत जास्त 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतात. यंदाच्या मोसमात केकेआरचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले. बदललेल्या या नियमांबाबत फक्त केकेआरच नाही तर आणखी काही टीमनीही नाराजी व्यक्त केल्याचं वृत्तही क्रिकबझने दिलं आहे. मंगळवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर 120 मिनिटांच्या नियमाचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
120 मिनिटांच्या नव्या नियमामुळे आता पाऊस पडत असेल तरी 20-20 ओव्हरचा सामना 9.30 वाजता सुरू होऊ शकतो, याआधी पूर्ण 20-20 ओव्हरचा सामना 8.30 वाजता सुरू होणं बंधनकारक होतं, त्यानंतर ओव्हर कमी होत जायच्या. याशिवाय आता नव्या नियमामुळे रात्री 12 वाजता 5-5 ओव्हरची मॅच खेळवली जाऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2025 4:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : रहाणेवर अन्याय झाला, शेवटच्या क्षणी नियम बदलल्याने KKR नाराज, थेट बीसीसीआयकडे तक्रार