स्वप्नातील घराची चावी हातात येण्याआधीच काळाचा डाव; मनाला चटका लावून गेली ठाण्यातील 'ती' घटना
Last Updated:
Thane Slab Collapse : ठाण्यातील लोकमान्यनगरमध्ये झोपेत असलेल्या कुटुंबावर स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. या दुर्घटनेने शहरातील जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ठाणे : स्वतःचं हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी पाहतो. त्या स्वप्नासाठी तो दिवस-रात्र मेहनतही करतो, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो आणि फक्त कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी झटत राहतो. त्या घरात आपले सगळे सुख, आनंद आणि समाधान साठवायचं असतं. नव्या घरात कुटुंबीयांसोबत आनंदाने राहायचं हीच त्याची एकमेव अपेक्षा असते.
मात्र हे सुंदर स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने घाला घातला. ज्या घरात आनंदाचे क्षण साठवायचे होते तिथेच दुर्दैवाने मृत्यूने दार ठोठावले. ठाण्यात घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. घरातील कर्ता पुरुष तो क्षणात कायमचा निघून गेला. हे दृश्य पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
नेमकं काय घडलं?
ठाण्यातील लोकमान्यनगरमध्ये हा प्रसंग घडलेला असून मनोज मोरे या (वय45) वर्षीय व्यक्तीचा यात मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्यनगर परिसरातील करुमेदेव सोसायटीत मनोज मोरे हे आपल्या कुटुंबियांसोबत भाड्याने राहत होते. जी इमारत साधारण 16 वर्षे जुनी आहे. शनिवारी पहाटे घरातील हॉलमध्ये झोपले असताना अचानक प्लास्टरसह स्लॅबचा मोठा भाग कोसळला. त्या वेळी चार जण झोपेत होते. पत्नी अर्पिता मोरे यांच्या डोक्याला दुखापत झाली तर 16 वर्षीय आरुष मोरेच्या दोन्ही पायांना मार बसला. मात्र सर्वाधिक गंभीर दुखापत मनोज मोरे यांच्या छातीला झाली.
advertisement
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अन् काही सेकंदांतच कुटुंबाचा आधार हिरावून घेतला गेला. यातील भावनिक गोष्ट म्हणजे मनोज मोरे येथे भाड्याने राहण्याचे कारण हे होती की, त्यांचे भांडुपमधील स्वत:च्या घराचे पुनर्विकास काम सुरू होते. पण काही दिवसांसाठी येथं येणे त्यांना आयुष्यभरासाठी दुखात टाकले आहे.
advertisement
या घटनेनंतर महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे यांनी घटनास्थळी पाहणी करून इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले. मात्र प्रश्न असा आहे की एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे का होते? ठाण्यात आजही हजारो नागरिक अशाच धोकादायक आणि जीर्ण इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत. पुढचा बळी कोण, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 14, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
स्वप्नातील घराची चावी हातात येण्याआधीच काळाचा डाव; मनाला चटका लावून गेली ठाण्यातील 'ती' घटना










