सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकरी पारंपरिक शेती न करता प्रयोगशील शेती करून आर्थिक नफा कसा वाढवता येईल याचा विचार करून शेती करत आहे. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कोरटी गावात राहणारे शेतकरी प्रवीण जगन्नाथ वाघमोडे यांनी केला आहे. एका एकरात डाळिंबाच्या बागेत अर्धा एकर पहिल्यांदाच हिरवी मिरचीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. मिरचीच्या लागवडीसाठी प्रवीण यांना दहा हजार रुपयांपर्यंत खर्च आला असून आतापर्यंत मिरचीचे सहा तोडे झाले असून खर्च वजा करून चाळीस हजारांचा नफा मिळाला आहे. तर आणखी मिरचीची तोडणी सुरू असून दोन ते तीन महिन्यात हिरवी मिरची विकून एक ते दीड लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती प्रयोगशील शेतकरी प्रवीण वाघमोडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.



