"भारताकडून मोठ्या युद्धाची तयारी", पाकिस्तानला फुटला घाम, राष्ट्रपतींचं संसदेत मोठं विधान
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आखाती देश युद्धजन्य परिस्थितीत होरपळत असताना आता पाकिस्तानने मात्र भारताचा धसका घेतला आहे.
दिल्ली: सध्या आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेनं संयुक्तपणे इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचा सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर युद्धाची धग संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये पोहोचली आहे. इराणने प्रत्युत्तर देताना सौदी अरबसह, बहरीन अबुधाबी अशा विविध देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवले आहेत. आखाती देश युद्धजन्य परिस्थितीत होरपळत असताना आता पाकिस्तानने मात्र भारताचा धसका घेतला आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य करताना एक खळबळजनक दावा केला आहे. "भारत सध्या एका मोठ्या युद्धाची तयारी करत असून भारतीय नेते उघडपणे युद्धाची भाषा करत आहेत," असे जरदारी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. मात्र, आपण प्रादेशिक शांततेचे समर्थक असून युद्धाचा मार्ग कधीही योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
advertisement
भारताला चर्चेचे आवाहन
जरदारी यांनी भारताला युद्धाचा मार्ग सोडून चर्चेच्या टेबलावर येण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "माझा भारताला हाच संदेश आहे की, त्यांनी युद्धाच्या वातावरणातून बाहेर पडावं आणि अर्थपूर्ण संवादासाठी पुढे यावं. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी संवाद हाच एकमेव पर्याय आहे." दक्षिण आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जरदारी यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
advertisement
अफगाणिस्तान आणि दहशतवादावर कडक भूमिका
केवळ भारतच नव्हे, तर जरदारी यांनी शेजारील अफगाणिस्तानवरही भाष्य केलं आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या संयमाची सीमा आता संपली आहे. अफगाणिस्तानने दोहा कराराचा भंग केल्याचा आरोपही त्यांनी केला.
'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) आणि 'बलोचिस्तान लिबरेशन आर्मी' (BLA) सारख्या संघटनांना अफगाणिस्तानात आश्रय मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य शक्तीला पाकिस्तानची शांतता भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
advertisement
इराणचं समर्थन
इराणच्या संदर्भात बोलताना जरदारी यांनी इराणच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले आणि अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवायांचा त्यांनी निषेध केला आहे. दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर पाकिस्तानव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कर्दूमध्ये हिंसक निदर्शने झाली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे लष्कर तैनात करण्यात आले असून तीन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकीकडे भारतासोबत शांततेची चर्चा आणि दुसरीकडे अफगाणिस्तान सीमेवर सुरू असलेल्या चकमकींमुळे पाकिस्तान सध्या दुहेरी पेचात अडकल्याचे चित्र दिसत आहे.
Location :
Delhi
First Published :
Mar 03, 2026 7:20 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
"भारताकडून मोठ्या युद्धाची तयारी", पाकिस्तानला फुटला घाम, राष्ट्रपतींचं संसदेत मोठं विधान







