शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, उन्हाचा तडाख्यासह मुसळधार पाऊस बरसणार, २० जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आता मॉन्सूनचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे. राज्याच्या बहुतांश भागातून पावसाळा परतला असून, सध्या उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.
मुंबई : महाराष्ट्रात आता मॉन्सूनचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे. राज्याच्या बहुतांश भागातून पावसाळा परतला असून, सध्या उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. मात्र, हवामान विभागानुसार आज (१५ ऑक्टोबर) राज्याच्या काही भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून सुमारे १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कोमोरीन भागाकडे सरकते आहे. या प्रणालीमुळे लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत १९ ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण पुन्हा एकदा पावसासाठी पोषक बनले आहे.
advertisement
मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण, उकाडा आणि उन्हाचा चटका कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांच्या वर गेले असून, दुपारच्या वेळेत बाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. रत्नागिरी येथे सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर सांताक्रूझ, जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी आणि अमरावती येथे ३४ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदले गेले आहे.
advertisement
कोणत्या जिल्ह्याला येलो अलर्ट?
आज (१५ ऑक्टोबर) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
advertisement
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची परतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मॉन्सून परतला असून, १४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये, ओडिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांतूनही पावसाळ्याचा निरोप झाला आहे. पुढील दोन दिवसांत देशातून मॉन्सून पूर्णपणे परतेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (Northeast Monsoon) सक्रिय होण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या राज्यात दिवसाच्या वेळेत प्रखर ऊन आणि रात्री थोडी थंड हवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 7:45 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, उन्हाचा तडाख्यासह मुसळधार पाऊस बरसणार, २० जिल्ह्यांना अलर्ट