स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानी घेतला निर्णय, केली रेशीम शेती, वर्षाला साडेतीन लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान त्यांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि रेशीम शेतीची निवड केली.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : जिल्ह्यातील गावंदरा या छोट्याशा गावातील तरुण विकास आगाव यांनी पारंपरिक शेतीला नवा आयाम देत रेशीम शेतीकडे वाटचाल केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान त्यांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि रेशीम शेतीची निवड केली. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या त्यांच्या ध्येयाने त्यांना सतत प्रोत्साहित केलं आणि आज ते यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत.
advertisement
विकास यांनी सुरुवातीला रेशीम शेतीबाबत सखोल अभ्यास केला. तज्ज्ञांशी चर्चा केली, शासनाच्या विविध योजना समजून घेतल्या आणि छोट्या प्रमाणात प्रयोग सुरू केला. योग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पहिल्याच टप्प्यात चांगले उत्पन्न मिळवले. त्यांच्या या यशामुळे गावातील इतर शेतकरीही रेशीम शेतीकडे वळण्यास उत्सुक झाले आहेत. रेशीम किड्यांच्या पालनापासून ते कोष निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब केला.
advertisement
प्रारंभी कमी भांडवलात सुरू केलेल्या या शेतीत आज विकास यांना वर्षाला तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती अधिक फायदेशीर ठरत असल्याचं त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सिद्ध केलं आहे. आज ते फक्त स्वतःच नव्हे तर इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत. त्यांची यशोगाथा पाहून अनेक युवक शेतीकडे आकर्षित होत आहेत.
advertisement
विकास यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हवामान बदल, योग्य जोमदार झाडांची निवड, रोगप्रतिकारक क्षमता असलेले किडे यासारख्या अनेक गोष्टींवर त्यांनी विशेष लक्ष दिले. शासनाच्या योजनांचा लाभ घेत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी आपली शेती अधिक यशस्वी केली. यासाठी त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने माहिती घेतली आणि आपल्या ज्ञानाचा फायदा घेत रेशीम शेतीतील संकटांना सामोरे गेले.
advertisement
आज विकास आगाव हे त्यांच्या यशस्वी रेशीम शेती व्यवसायामुळे आसपासच्या गावांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठीच नव्हे तर इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतीमध्ये प्रयोगशीलता, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधल्यास यश हमखास मिळते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. भविष्यातही अधिक नावीन्यपूर्ण प्रयोग करत शेतीच्या माध्यमातून प्रगती करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
March 14, 2025 3:41 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानी घेतला निर्णय, केली रेशीम शेती, वर्षाला साडेतीन लाख कमाई