Success Story : सांगलीच्या शेतकऱ्याची कमाल, 30 गुंठ्यात 90 टन घेतलं ऊस उत्पादन, अख्खं गाव पाहतच राहिलं!
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पोखर्णी गावचे सरपंच विश्वनाथ जाधव यांनी राजकारण आणि शेतीच्या नियोजनाचा योग्य मेळ घालत 30 गुंठे शेतीतून 90 टन ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे.
सांगली: ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातील हुकमी पीक समजले जाते. ऊस शेतीच्या चोख नियोजनातून इथले शेतकरी आर्थिक समृद्धीचा गोडवा चाखतात. यापैकीच सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पोखर्णी गावचे सरपंच विश्वनाथ जाधव यांनी राजकारण आणि शेतीच्या नियोजनाचा योग्य मेळ घालत 30 गुंठे शेतीतून 90 टन ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे.
पोखर्णीच्या डोंगरकड्यालगतच्या माळरानावरील 30 गुंठे शेतात त्यांनी मे महिन्यामध्ये चांगले कुजलेले एकरी सहा ट्रॉली शेणखत टाकून उभी-आडवी नांगरट केली. एक महिना शेत तसेच ठेवून जून 2024 मध्ये साडेचार फूट सरी सोडली. यामध्ये को-86032 ऊसाची जातीची आडसाली लागण केली. पाण्याचे योग्य नियोजन साधत दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला.
सेंद्रिय खतांवर अधिक भर
तीन महिन्यांनी फोडणीवेळी खतांचा डोस तसेच वेळोवेळी सेंद्रिय खते आणि रासायनिक खतांचे संतुलित व्यवस्थापन केले. खत व्यवस्थापनाकरिता पोखर्णी येथील अशोका ऍग्रो यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेत असल्याचे पाटील सांगतात. तज्ञांच्या सल्ल्याने वेळच्यावेळी फवारण्या आणि विद्राव्य खते दिली.
advertisement
पंचेचाळीस कांड्यांवर ऊस
यंदा सततच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. मशागत आणि खत व्यवस्थापनाचे वेळापत्रक कोलमडल्याने ऊस उताऱ्याला फटका बसला आहे. ऊस उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. मात्र जाधव यांची शेती माळरानाची असल्याने उत्पादन घटीचा फटका बसला नाही. वेळच्या वेळी पाण्याचा निचरा, खतांचे डोस आणि शेताची मशागत करता आली. दीड वर्ष काळजीपूर्वक सांभाळलेल्या आडसाल उसाची जोमाने वाढ झाली. प्रत्येक उसामध्ये 42 ते 45 कांड्या आणि चांगली जाडी आणि वजन मिळाले.
advertisement
रासायनिक खतांच्या भरमसाट मात्रा देत अनेक शेतकरी ऊस उत्पादन वाढीसाठी झटत असतात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सेंद्रिय खतांवर अधिक भर देत आहोत. शिवाय यंदाच्या प्लॉटला केळीचा बेवड अधिक फायदेशीर ठरलाय. मातीची ताकद वाढवण्यातून प्रतिगुंठा तीन टनाचे उच्चांकी उत्पादन शक्य झाल्याचा अनुभव सरपंच जाधव सांगतात. जाधव कुटुंबाचे अभ्यासपूर्ण नियोजन, कुटुंबातील एकीचे बळ अन् पिढ्यानपिढ्यांचा शेतीचा अनुभव परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरतो आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Dec 08, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : सांगलीच्या शेतकऱ्याची कमाल, 30 गुंठ्यात 90 टन घेतलं ऊस उत्पादन, अख्खं गाव पाहतच राहिलं!








