Groundnut Diseases: टिक्का रोगामुळे भुईमुगाचे नुकसान, रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे करा उपाय, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
भुईमुगाच्या पिकावर सध्या टिक्का नावाचा रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. या रोगामुळे पानांवर डाग पडतात, पानगळ होते आणि शेवटी पिकाचे मोठे नुकसान होते
बीड : भुईमुगाच्या पिकावर सध्या टिक्का नावाचा रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. या रोगामुळे पानांवर डाग पडतात, पानगळ होते आणि शेवटी पिकाचे मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील कृषी तज्ज्ञ शरद राठोड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून टिक्का रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त माहिती दिली आहे.
शरद राठोड यांनी सांगितले की, टिक्का हा रोग दोन प्रकारच्या बुरशीमुळे होतो. एक अर्ली टिक्का आणि दुसरा लेटर टिक्का. या रोगामध्ये पानांवर गोलसर तपकिरी किंवा काळसर डाग पडतात. यामुळे पानांची झपाट्याने गळती होते आणि झाड योग्य प्रकारे वाढत नाही. हे रोग झाडावर लवकर पसरतात आणि शेवटी दाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
advertisement
या रोगापासून बचाव करण्यासाठी राठोड यांनी शेतकऱ्यांना काही उपाय सांगितले. त्यांनी म्हटले की, रोगप्रतिकारक जात वापरणे, JL 24, TAG 24 यांचा उपयोग करावा. त्याचबरोबर शेतात पिकांचे फेरपालट करावा. म्हणजे दरवर्षी एकाच जागी भुईमुगाचे पीक टाळावे. रोगट झाडांचे अवशेष जाळून नष्ट करावेत जेणेकरून पुढच्या हंगामात रोग पसरू नये.
advertisement
रासायनिक फवारणीबाबत त्यांनी सांगितले की, मँकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ही फवारणी रोग दिसताच करावी आणि त्यानंतर दर 10-12 दिवसांनी किमान दोन वेळा करावी. फवारणी करताना पाऊस नसावा आणि हवामान कोरडे असावे. यामुळे फवारणीचा चांगला परिणाम होतो.
शेवटी शरद राठोड यांनी असेही सांगितले की, नैसर्गिक उपाय देखील उपयोगी ठरतात. ट्रायकोडर्मा, निम अर्क किंवा लसूण-गूळ काढा यांची फवारणी केल्यास रोगावर आळा बसतो. शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्यास टिक्का रोगाचा धोका कमी करता येतो आणि भुईमुगाचे चांगले उत्पादन घेता येते.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
June 03, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Groundnut Diseases: टिक्का रोगामुळे भुईमुगाचे नुकसान, रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे करा उपाय, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

