कोकणच्या हापूसवर गुजरातचा दावा! आंबा उत्पादक शेतकरी संकटात
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : गोडवा, सुगंध आणि दर्जासाठी जगभरात ओळख असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनाच्या (GI Tag) मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : गोडवा, सुगंध आणि दर्जासाठी जगभरात ओळख असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनाच्या (GI Tag) मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यातील हापूस आंब्याला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या मानांकनाला गुजरातकडून थेट आव्हान दिले गेले आहे. गुजरात सरकारच्या पाठबळावर ‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्यात आल्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
advertisement
कोकण हापूसला मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण GI मानांकन
‘कोकण हापूस’ हा जगातील पहिला आणि एकमेव हापूस आंबा आहे, ज्याला स्वतंत्र भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. 2018 साली मिळालेल्या या GI टॅगमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि परिसरातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात वेगळी ओळख, चांगला दर आणि संरक्षण मिळाले. या मानांकनामुळे कोकण हापूसची निर्यात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये वाढली आहे. GI टॅगमुळे बनावट किंवा इतर राज्यातील आंब्यांची ‘कोकण हापूस’ म्हणून विक्री रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
advertisement
गुजरातचा ‘वलसाड हापूस’साठी अर्ज
गुजरातमधील गांधीनगर व नवसारी कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून 2023 मध्ये ‘वलसाड हापूस’ या नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाची प्राथमिक सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी पार पडली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. गुजरातच्या या दाव्यामुळे एकाच आंबा जातीसाठी वेगवेगळी मानांकनं मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती कोकणातील उत्पादक व्यक्त करत आहेत.
advertisement
कोकण आंबा उत्पादकांचा तीव्र विरोध
या अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘कोकण हापूस’ हे नाव कोणत्याही एका राज्यासाठी नसून विशिष्ट भौगोलिक, हवामान आणि मातीच्या परिस्थितीत पिकलेल्या आंब्यासाठी राखीव आहे. कोकणातील चार जिल्ह्यांतील वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळेच या आंब्याची चव, रंग आणि टिकाऊपणा वेगळा ठरतो.
advertisement
भेसळीचा प्रश्न अद्यापही गंभीर
डॉ. भिडे यांनी पुढे सांगितले की, सध्या कर्नाटक, केरळ, तमिळनाडू तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातील आंब्यांची ‘कोकण हापूस’ म्हणून भेसळ केली जाते. भेसळ रोखण्यासाठी क्यूआर कोडसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या, तरीही गैरप्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत ‘वलसाड हापूस’ला मानांकन मिळाल्यास भेसळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेचा प्रश्न
जर गुजरातच्या ‘वलसाड हापूस’ला स्वतंत्र GI टॅग मिळाला, तर कोकणातील हजारो आंबा उत्पादकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा संघटनेने दिला आहे. यापूर्वी आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या ‘मलावी हापूस’ या नावावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. भविष्यात ‘कर्नाटक हापूस’ किंवा अन्य नावांनी अर्ज झाले, तरी त्यालाही कडाडून विरोध केला जाईल, असे डॉ. भिडे यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 1:17 PM IST


