शहरी भागांत जमीन खरेदी -विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Property Rules : राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी तुकडेबंदी अधिनियमात ऐतिहासिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी तुकडेबंदी अधिनियमात ऐतिहासिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो छोट्या भूखंडधारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळणार असून, दीर्घकाळ रखडलेले जमीन व्यवहार आणि रजिस्ट्री प्रक्रिया आता सुलभ होणार आहेत.
काय आहे तुकडेबंदी कायदा?
राज्यात शेतजमिनींचे अतिलहान तुकडे होऊ नयेत आणि शेती किफायतशीर राहावी या उद्देशाने तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार जिरायती क्षेत्रातील २० गुंठ्यांपेक्षा कमी आणि बागायत क्षेत्रातील १० गुंठ्यांपेक्षा कमी जमिनींची खरेदी-विक्री करता येत नव्हती. या मर्यादेमुळे अनेक नागरिकांना मालकी हक्क मिळविणे, बांधकाम परवाना घेणे आणि जमिनीची नोंदणी करणे कठीण झाले होते.
advertisement
नवीन नियम काय असतील?
हा कायदा शिथिल करत नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि गावठाणालगत २०० ते ५०० मीटरपर्यंतचा परिसर या निर्णयाच्या कक्षेत येणार आहे. महापालिकांच्या सीमेलगत दोन किलोमीटरपर्यंतचा भाग देखील विचारात घेतला जाणार आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या एक गुंठ्यापर्यंतच्या जमिनींचे तुकडे आता कायदेशीररित्या नियमित करण्यात येतील.
advertisement
पूर्वी या नियमितीकरणासाठी जमिनीच्या बाजारमूल्याच्या २५ टक्के शुल्क आकारले जात होते. नंतर डिसेंबर २०२३ मध्ये हे शुल्क ५ टक्क्यांवर आणण्यात आले होते. मात्र या योजनेस अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने आता पूर्णपणे विनाशुल्क नियमितीकरणाची घोषणा केली आहे.
नागरिकांना मिळणारे फायदे
या निर्णयामुळे सुमारे ५० लाखांहून अधिक कुटुंबांना थेट लाभ होणार आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे शहरी आणि उपनगरी भागातील नागरिकांना आपली मालमत्ता कायदेशीर करण्याची संधी मिळेल. तसेच लहान भूखंडधारकांना विनाशुल्क जमिनीचे नियमितीकरण करता येईल. मालकी हक्क मिळाल्याने मालमत्तेचे बाजारमूल्य वाढेल. बांधकाम परवाना मिळविणे सुलभ होईल.नोंदणीकृत मालमत्ता असल्याने बँका तारण म्हणून जमीन स्वीकारतील आणि कर्ज मिळविणे सोपे होईल. कुटुंबातील हिस्से कायदेशीररीत्या नोंदविणे शक्य होईल. शहरी भागात लहान भूखंड विक्री-विकत घेणे अधिक सुलभ होईल.
advertisement
भविष्यातील परिणाम
या निर्णयामुळे राज्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या जमिनींचे व्यवहार आणि मालकी हक्काच्या प्रक्रिया गतीमान होतील. तसेच नागरी भागातील अव्यवस्थित भूखंड व्यवहारांना कायदेशीर चौकट मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शहरी भागांत जमीन खरेदी -विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार?