अमेरिकेला 'जोर का झटका' रशिया भारतामधून शेतीमालाची आयात वाढवणार, शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agricultural Exports: अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर रशियाने भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर रशियाने भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या प्रशासनाला भारताकडून शेतीमाल आणि औषधांची खरेदी वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेने लादलेल्या उच्च आयात शुल्कामुळे अडचणीत आलेल्या भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळू शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्कवाढ लादून व्यापार क्षेत्रात दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी थांबवावे आणि अमेरिकेच्या जीएम मका व सोयाबीनसह इतर शेतीमालासाठी बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी केली होती. मात्र, भारताने ही मागणी नाकारल्याने अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क वाढवले, तसेच रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे २५ टक्के दंडात्मक शुल्क लावले आहे.
advertisement
या निर्णयाचा फटका भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या कापड, कोळंबी, सोयापेंड, फळे आणि भाजीपाला निर्यातीवर बसला असून, अनेक निर्यातदार आणि उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
अशा परिस्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, रशिया भारतातून शेतीमाल आणि औषधे अधिक प्रमाणात आयात करणार आहे. त्यांनी सांगितले, “भारताकडून अधिक शेतीमाल खरेदी केला जाऊ शकतो आणि औषधांसाठी आम्ही ठोस पावले उचलणार आहोत. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी थांबवले, तर रशियाला सुमारे ९०० अब्ज ते १०० कोटी डॉलर्सचे नुकसान होईल,” असे त्यांनी वालदाई डिस्कशन क्लबच्या वार्षिक परिषदेत स्पष्ट केले.
advertisement
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारत-रशिया द्विपक्षीय व्यापार ६,८७० कोटी डॉलर्स इतका झाला आहे. त्यात भारताचा वाटा फक्त ४८८ कोटी डॉलर्स, तर रशियाचा वाटा ६,३८४ कोटी डॉलर्स होता. म्हणजेच भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्चे तेल आयात करतो आणि या व्यापारात असमतोल आहे. त्यामुळे या असमतोलाला आळा घालण्यासाठी पुतीन यांनी त्यांच्या प्रशासनाला उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
पुतीन काय म्हणाले?
पुतीन यांनी भारतासोबतच्या संबंधांबद्दल बोलताना सांगितले, “रशिया आणि भारत यांच्यात कधीही तणाव निर्माण झालेला नाही. दोन्ही देशांनी नेहमीच संवेदनशीलतेने व परस्पर आदराने निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे चांगले मित्र आहेत. ते ‘समतोल साधणारे’, ‘बुद्धिमान’ आणि ‘राष्ट्रहित पाहणारे नेता’ आहेत,” असे कौतुकाचे उद्गार त्यांनी काढले.
त्यांनी पुढे म्हटले की, “अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याचा जो दबाव आणला, त्यापुढे भारत झुकला नाही. ही भारताच्या स्वाभिमानाची आणि स्वावलंबनाची खूण आहे. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे भारताचे जे नुकसान झाले, ते रशियाकडून वाढीव व्यापार आणि तेल खरेदीमुळे भरून निघेल. त्यामुळे भारताची एक सार्वभौम राष्ट्र म्हणून प्रतिष्ठा अधिक दृढ होईल.”
advertisement
सध्या भारतातून रशियाला मासे, कोळंबी, तांदूळ, तंबाखू, चहा, कॉफी, द्राक्षे यांसारखा शेतीमाल निर्यात होतो. याशिवाय रासायनिक उत्पादने, औषधे, पोलाद, यंत्रसामग्री, काच, कपडे, चामडे, रबर वस्तू आणि शस्त्रक्रिया उपकरणे ही उत्पादने देखील मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात.
रशियाच्या या भूमिकेमुळे भारत-रशिया संबंध अधिक मजबूत होण्याची आणि भारतीय निर्यातदारांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 9:29 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
अमेरिकेला 'जोर का झटका' रशिया भारतामधून शेतीमालाची आयात वाढवणार, शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार?