मुंबईरिटर्न झिलाचो कोकणात यशस्वी प्रयोग! ना भात, ना आंबा, शेतात पिकवतो लाखोंची संपत्ती
- Reported by:Sitraj Ramesh Parab
- local18
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
वैभव सुट्टीत आई-वडिलांसोबत कणकवलीत आपल्या गावी जात असे, एवढीच काय त्याला गावाविषयी माहिती. त्याच्या आजोबांची शेती काही वर्षांपासून गावी पडीक होती. इथंच...
सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : उच्च शिक्षणासाठी, चांगल्या नोकरीसाठी मुंबई, पुण्याची वाट धरणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. अनेकजण तिथंच स्थायिकही होतात. परबांचो वैभवही त्यातलोच एक. पण तो मुंबईक येऊन नाय काय, तर कोकणाक जाऊन लखपती झालो. कसा काय, जाणून घेऊया.
वैभव प्रभाकर परब या 28 वर्षीय तरुणाचा जन्म मुंबईचा. इथंच बी.कॉमपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून त्यानं एका खासगी कंपनीत नोकरी करायला सुरूवात केली. यावेळी त्याचे सहकारी परांजपे यांनी त्याला परफ्यूमसाठी कच्चामाल असलेल्या पचौली वनस्पतीची लागवड कोकणात होऊ शकते, असा सल्ला दिला. मग काय, वैभवच्या डोक्यात हळूहळू त्याची शेती पिकू लागली.
advertisement
वैभव सुट्टीत आई-वडिलांसोबत कणकवलीत आपल्या गावी जात असे, एवढीच काय त्याला गावाविषयी माहिती. त्याच्या आजोबांची शेती काही वर्षांपासून गावी पडीक होती. इथंच सुगंधी वनस्पतीची लागवड करता येईल असा विचार त्याच्या मनात आला. याविषयी त्यानं माहिती मिळवायला सुरुवात केली.
अखेर 2018 साली त्यानं कणकवलीच्या करंजेत आपल्या मातीत शेतीचा शुभारंभ केला. 10 गुंठे जागेत सुगंधी वनस्पतीची 1 हजार रोपं लावली. वैभव मुंबईतील नोकरी सांभाळून गावी शेती करत होता. मग 2020 साली नोकरीचा राजीनामा देऊन त्यानं पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
'पचौली' ही झुडुपवर्गीय वनस्पती. तिची वाढ अडीच ते 3 फुटांपर्यंत होते. वर्षातून 3 वेळा तिची तोडणी करावी लागते. तोडणी केल्यानंतर सावलीत सुकवून त्यावर तेल निर्मितीसाठीची पुढील प्रक्रिया केली जाते. जगभरात या सुगंधी वनस्पतीला मोठी मागणी आहे. कोकणात नारळ बागेत डोंगर उतारावर या सुगंधी वनस्पतीची लागवड शक्य असल्याचं शेतीतज्ज्ञ सांगतात. जिथं पूर्वी भात किंवा ऊस शेती होत होती अशा शेतात पचौली लागवडीचा यशस्वी प्रयोग वैभवनं केला आहे. यासाठी सुरुवातीला जमिनीची साफसफाई आणि मशागत करण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च आला. आज त्यानं साडेचार एकर जमिनीवर पचौली वनस्पतीची लागवड केली आहे.
advertisement
वैभवला या व्यवसायातून आज पूर्ण खर्च वगळून वर्षाकाठी एकरी अडीच ते 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. मुंबईतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे जाऊन शेती करणं, हा निर्णय काही सोपा नव्हता, मात्र वैभवनं आपल्या नावाप्रमाणेच शिवारात वैभव पिकवलं, आज त्यातून तो सुखा-समाधानाचं आयुष्य जगतोय. अनेक तरुणांसाठी तो आदर्श ठरला आहे. शेवटी काय, पगारासाठी काम सगळेच करतात, मात्र पॅशन म्हणून काम करण्याची मजा काही औरच असते आणि त्याचं फळही तसंच मिळतं.
Location :
Kankavli,Sindhudurg,Maharashtra
First Published :
Oct 27, 2024 3:09 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
मुंबईरिटर्न झिलाचो कोकणात यशस्वी प्रयोग! ना भात, ना आंबा, शेतात पिकवतो लाखोंची संपत्ती








