केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी नवी दिल्ली येथून ‘पंतप्रधान कडधान्ये अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ या दोन नव्या उपक्रमांचा प्रारंभ करतील. या योजनांचा उद्देश देशातील शेती उत्पादन वाढवणे, विशेषतः कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणे, असा आहे.
१०० जिल्ह्यांवर केंद्रित होणार लक्ष
चौहान म्हणाले, “देशभरातील सर्व जिल्ह्यांची उत्पादकता सारखी नाही. काही ठिकाणी उत्पादन चांगले आहे, तर काही भागात अत्यंत कमी आहे. त्यामुळे आम्ही कमी उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केली असून, त्या भागांमध्ये शेती उत्पादकता वाढवण्यासाठी ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’अंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.”
advertisement
या उपक्रमाद्वारे त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उच्च गुणवत्तेची बियाणे, सिंचनसुविधा आणि प्रशिक्षणाची मदत मिळेल. त्यामुळे एकूणच शेती उत्पादन वाढून देशातील अन्नधान्याच्या गरजा पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होण्यास मदत मिळेल.
कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरतेकडे पाऊल
भारत अजूनही कडधान्यांच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी झालेला नाही, हे मान्य करत चौहान यांनी सांगितले की, २०३०-३१ पर्यंत देशाला कडधान्यांत आत्मनिर्भर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
‘कडधान्ये अभियान’अंतर्गत लागवडीखालील क्षेत्र २७५ लाख हेक्टरवरून ३१० लाख हेक्टरपर्यंत वाढविणे, तसेच कडधान्यांचे उत्पादन २४२ लाख टनांवरून ३५० लाख टनांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या उपक्रमामुळे देशातील शेतकऱ्यांना बाजारभाव आणि उत्पादनक्षमता दोन्ही बाबतीत फायदा होईल.
शेतकऱ्यांशी थेट संवाद
आज शनिवारी पंतप्रधान मोदी देशभरातील यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आणि कृषी नवोन्मेषकांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादातून शेतकऱ्यांना नव्या योजनांची माहिती मिळेल आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजना आखली जाईल.
पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार?
शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक उत्सुकता असलेल्या पीएम किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याधी २०२४ मध्ये दिवाळीपूर्वी ५ ऑक्टोबर रोजी हप्ता जमा झाला होता. २०२२ मध्ये १७ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे यंदाही दिवाळीपूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.