सांगली : अतिवृष्टीवर आणि बदलत्या हवामानावर जिद्दीने मात करत बऱ्याच शेतकऱ्यांनी द्राक्षबागा पिकवल्या आहेत. यापैकीच सांगलीच्या पलूस तालुक्यातील नागठाणे गावचे माजी सैनिक प्रगतशील शेतकरी धनाजी पाटील यांच्या द्राक्ष पिकास 551 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. सततच्या हवामान बदलात त्यांनी द्राक्षबाग कशी पिकवली, त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला आणि नफा किती मिळाला? याबद्दल जाणून घेऊया.
advertisement
सततचा हवामान बदलामुळे द्राक्ष बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक द्राक्ष बागांना फळधारणा झाली नाही. तर बऱ्याच फुलोरा अवस्थेतील बागा वाढत्या धुक्याने वाया गेल्या. प्रतिकूल हवामानाशी सामना करत माजी सैनिक धनाजी पाटील यांनी द्राक्षबाग फुलवली. धनाजी पाटील यांची नागठाणे गावामध्ये बारा एकर शेती आहे. यापैकी 62 गुंठे शेतामध्ये त्यांनी द्राक्षबाग पिकवली आहे. 2014 पासून ते कृष्णा द्राक्ष व्हरायटीचे उत्पादन घेतात. अतिवृष्टीच्या काळात देखील त्यांनी उभ्या पावसामध्ये 9 सप्टेंबर 2024 रोजी बागेची पीक छाटणी घेतली. पीक छाटणी पासून डंपिंगपर्यंत पूर्ण काळ पावसाची सामना केला.
शेतकऱ्याचा नादच खुळा! मराठवाड्यात पिकवला पैसा, काश्मिरी रेड ॲपलनं केलं मालामाल
अति खर्चाने शेतकरी चिंतेत
सततच्या बदलत्या हवामानाने द्राक्ष बागेमध्ये औषधांचा खर्च वाढला आहे. अति पाऊस आणि दाट धोक्याचा सामना करण्यासाठी द्राक्ष पिकास महागडी औषधे द्यावी लागत आहेत. धनाजी पाटील यांना 62 गुंठे द्राक्ष बागेसाठी तब्बल 5 लाख 77 हजार रुपये इतका खर्च आला.
वटवाघळांच्या हल्ल्यातून वाचवली बाग
शंभर दिवस पूर्ण होताच पाटील यांच्या बागेवर वटवाघळांचा हल्ला झाला. द्राक्षामध्ये गोडी उतरताना वटवाघळांची धाड होताच त्यांनी घाई- घाईने बागेवर जाळी अंथरून घेतली. वटवाघळांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांना 62 हजार इतका खर्च करावा लागला. कष्टाने पिकवलेल्या बागेचे चलाकीने संरक्षण केले.
हार्वेस्टिंगच्या वेळी पुन्हा धुक्याचे संकट
अतिवृष्टीतून वटवाघळांच्या हल्ल्यातून वाचवलेली बाग पाटील यांनी विक्रीसाठी दिली. पण हार्वेस्टिंगच्या वेळी पुन्हा धुके वाढल्याने द्राक्ष मालाचे नुकसान झाले. द्राक्ष मालामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॅकिंग झाले आणि उत्पादनास फटका बसला. दाट धुक्याने दीड ते पावणे दोन टन मालाचा सुकवा झाला.
उत्पादनाबद्दल नाराजी
62 गुंठ्यामध्ये 7 टन 840 किलो उत्पादन मिळाले. यामधून त्यांना 8 लाखांची कमाई झाली आहे. परंतु अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याची नाराजी पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली. त्यांचा अनुभव आणि प्रयत्नांच्या गणितानुसार अधिक उत्पादनाची अपेक्षा होती. द्राक्ष उत्पादन असताना 551 रुपये चार किलो इतका विक्रमी दर मिळाला.
मिळालेले उत्पन्न वजा घातलेला खर्च हाती काय उरले?
पाटील यांच्या मते एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी शंभर रुपये उत्पादन खर्च आला. आणि चार किलो द्राक्षासाठी 551 रुपये दर मिळाला. मिळालेल्या दरातून उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्याचा कष्टाप्रमाणे समाधानकारक नफा मिळत नाही.
द्राक्ष उत्पादनाच्या विस्कटलेल्या गणितामुळे बरेच शेतकरी द्राक्ष बागा तोडून टाकत द्राक्ष शेती पासून दूर होत आहेत. औषधांना एमआरपी आहे परंतु शेतीमालास एमआरपी नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांना केली विनंती
हार्वेस्टिंगच्या वेळी अनेक व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. बदलत्या हवामानाची भीती घालून माल खरेदीची गडबड केली जाते. तसेच कित्येक व्यापारी शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडवून गायब होतात. याविषयी बोलताना धनाजी पाटील म्हणाले, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पिकाची खरेदी करावी. शेतकऱ्यांची लूट करू नये. शेतकरी जगले तर सारे जगतील. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. शेतकऱ्यांना हाताशी घेऊन चला शेतकरी तुम्हाला खांद्यावर घेऊन चालतील.
सरकारला सवाल
औषधे आणि खतांचा किंमती आवाक्या बाहेर आहेत. अस्मानी संकटांनी दाबून गेलेला शेतकरी महागाई व करांनी त्रासला आहे. तुमच्या कंपनीत तयार झालेल्या औषधांना एमआरपी आहे. अन् आमचा शेतमालास एमआरपीचं काय? हे असंच चालू राहिलं तर शेतकरी द्राक्ष उत्पादनापासून दूर जातील आणि द्राक्ष पिकावर अवलंबून असणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प होईल. तेव्हा 2019 पासून अस्मानी आणि सुलतानी संकटांनी दबलेल्या शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष करणे थांबवावे, अशी भावना धनाजी पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली.





