प्रक्रिया काय आहे?
महसूल विभागाच्या माहितीप्रमाणे, या प्रक्रियेसाठी सातबारावरील जिवंत असलेल्या खातेदारांपैकी एकानेच अर्ज करायचा असतो. अर्ज करताना फक्त मयत व्यक्तीचे नाव वगळण्याचा उल्लेख करावा लागतो. ही प्रक्रिया ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन करता येते किंवा नागरिक ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइनही अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे कोणते?
advertisement
या प्रक्रियेसाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये.
१) मयत खातेदाराचा मूळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला,
२) आधी वारस नोंद झालेल्या फेरफारची नक्कल,
३) सर्व जिवंत वारसांच्या वयाचा पुरावा (साक्षांकीत प्रत),
४) सर्व हयात वारसांच्या आधार कार्डची स्वसाक्षांकीत प्रत,
५) विहित नमुन्यातील शपथपत्र किंवा स्वयंघोषणापत्र,
६) सर्व वारसांचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील,
७) जर कोणता वारस परदेशात राहत असेल, तर त्याचा ई-मेल पत्ता आणि राहत्या ठिकाणाचा पुरावा आवश्यक आहे.
महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रक्रियेचा उद्देश म्हणजे जमीन अभिलेख स्वच्छ आणि अद्ययावत ठेवणे. अनेक वेळा मृत व्यक्तींची नावे अभिलेखात कायम राहिल्याने नंतर जमीन वाटप, विक्री किंवा बँक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वारसांच्या नावे नोंद झाल्यानंतर, मयत खातेदाराचे नाव वगळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी अशा फेरफार प्रक्रियेसाठी अनेक वेळा महसूल कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असत, पण आता ई-हक्क पोर्टलवरून घरबसल्या अर्ज सादर करून, प्रक्रिया ऑनलाईन ट्रॅक करता येते.
दरम्यान, सातबारा उताऱ्यावरून मयत खातेदाराचे नाव वगळणे ही एक साधी पण अत्यावश्यक प्रक्रिया आहे. यामुळे अभिलेखातील नोंदी अचूक राहतात आणि वारसांना भविष्यातील व्यवहारांसाठी कायदेशीर संरक्षण मिळते.