माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (CACP) शिफारशीच्या आधारे एमएसपीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा देशातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
सहा पिकांच्या एमएसपीतील वाढ
गहू : मागील हंगामातील २४२५ रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून २५८५ रुपये प्रति क्विंटल (+१६० रुपये)
advertisement
जवस : १९८० रुपये वरून २१५० रुपये प्रति क्विंटल (+१७० रुपये)
हरभरा : ५६५० रुपये वरून ५८७५ रुपये प्रति क्विंटल (+२२५ रुपये)
मसूर : ६७०० रुपये वरून ७००० रुपये प्रति क्विंटल (+३०० रुपये)
मोहरी : ५९५० रुपये वरून ६२०० रुपये प्रति क्विंटल (+२५० रुपये)
करडई : ५९४० रुपये वरून ६५४० रुपये प्रति क्विंटल (+६०० रुपये)
यात करडईसाठी सर्वाधिक ६०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर मसूरच्या एमएसपीत ३०० रुपयांची वाढ झाली आहे.
डाळी आत्मनिर्भरतेसाठी विशेष अभियान
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत "कडधान्य आत्मनिर्भरता अभियान" या महत्त्वाकांक्षी योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत २०२५-२६ ते २०३०-३१ या सहा वर्षांच्या कालावधीत देशांतर्गत डाळींचे उत्पादन वाढवून आयात कमी करणे आणि स्वयंपूर्णता साध्य करणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेसाठी ११,४४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
सरकारने २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. यानुसारच यंदाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आल्याचे मंत्रिमंडळाने स्पष्ट केले आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि मोहरीसारख्या पिकांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात चांगली वाढ होईल.
गव्हाचे विपणन वर्ष एप्रिलपासून सुरू होते आणि जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे या निर्णयाचा थेट फायदा शेतकऱ्यांना लवकरच दिसून येईल. हरभरा, मसूर आणि तेलबियांच्या किमतींमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांना अधिक पिकवण्यासाठी प्रोत्साहन देईल.