जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि पिकांच्या हानीचा सखोल आढावा घेतल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रभावित भागातील नागरिकांना दुष्काळसदृश परिस्थितीत मिळणाऱ्या सवलती आणि सुविधा देण्यात येणार आहेत.
मुख्य सवलती कोणत्या मिळणार?
जमीन महसूलात सूट.
सहकारी कर्जांचे पुनर्गठन.
शेतीशी संबंधित कर्ज वसुलीवर एक वर्षाची स्थगिती.
advertisement
तिमाही वीज बिलात माफी.
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क आणि फीमध्ये सूट.
नुकसानाचा आढावा
राज्यभरातील जिल्हास्तरीय यंत्रणांनी पंचनामे पूर्ण केले असून, जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान २६.६९ लाख हेक्टर क्षेत्र, तर सप्टेंबर महिन्यात आणखी ३९ लाख हेक्टर क्षेत्र पूरग्रस्त घोषित करण्यात आले. या कालावधीत अनेक गावांमध्ये मनुष्यहानी, जनावरांचे मृत्यू, घरे कोसळणे आणि नागरिकांचे स्थलांतर अशा घटना घडल्या.
किती तालुक्यांचा समावेश
पश्चिम महाराष्ट्र
पालघर जिल्ह्यात पालघर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगड हे ४ तालुके पूर्णतः बाधित ठरले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १५ तालुके प्रभावित असून, मालेगाव, नाशिक, सटाणा, निफाड, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, सिन्नर, त्र्यंबकेश्वर यांसह काही तालुके अंशतः बाधित आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री आणि सिंदखेडा हे ३ तालुके पूर्णतः बाधित आहेत. जळगाव जिल्ह्यात एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर असे १३ तालुके पूरग्रस्त घोषित झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १४ तालुके बाधित ठरले असून, त्यात पारनेर, संगमनेर, अकोले अंशतः तर शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदा आणि नेवासा हे पूर्णतः बाधित आहेत. पुण्यात हवेली आणि इंदापूर हे तालुके प्रभावित आहेत. सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके बाधित असून त्यात उत्तर व दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर आणि माढा आदींचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात १० तालुके तर साताऱ्यात ८ तालुके पूरग्रस्त घोषित झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगडसह एकूण ८ तालुके बाधित आहेत.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये ९, जालना जिल्ह्यात ८, बीडमध्ये ११, लातूरमध्ये १०, धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये ८, नांदेडमध्ये सर्वाधिक १६, परभणीत ९ आणि हिंगोली जिल्ह्यात ५ तालुके बाधित आहेत.
विदर्भ
बुलढाण्यात १३, अमरावतीत १४, अकोलात ७, वाशिममध्ये ६, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १६, वर्ध्यात ७, नागपुरात १३, भंडाऱ्यात ७, गोंदियात ८, चंद्रपूर जिल्ह्यात १४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके प्रभावित ठरले आहेत.
संपूर्ण राज्यभर या पूरस्थितीत नाशिक, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव हे जिल्हे सर्वाधिक नुकसानग्रस्त ठरले आहेत. शासनाच्या अहवालानुसार, एकूण २८२ तालुक्यांपैकी २५१ तालुके पूर्णतः आणि ३१ तालुके अंशतः बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे सरकारने या सर्व भागांना आपत्तीग्रस्त घोषित करून दुष्काळसदृश सवलती आणि मदतीचा लाभ देण्यास मंजुरी दिली आहे.