सोलापूर : कांदा, टोमॅटो, बटाटा, मिरची, कढीपत्ता या पदार्थांचा जवळपास दररोज जेवणात वापर होतो. बाजारात त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे या पदार्थांच्या लागवडीतून शेतकरी बांधव अगदी मालामाल होऊ शकतात. आज अनेक शेतकरी या उत्पादनातून उत्तम उत्पन्न मिळवतात.
सोलापूर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर डोणगाव आहे. इथले शेतकरी आनंद शेटे यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं. त्यातून कढीपत्त्याची लागवड करण्याची कल्पना त्यांना सूचली. आज 3 एकर शेतातील कढीपत्त्याच्या लागवडीतून त्यांची वार्षिक कमाई होते लाखोंची.
advertisement
शेतकरी आनंद शेटे हे 10 वर्षांपासून कढीपत्त्याची शेती करतात. वर्षातून 3 वेळा छाटणी करून विक्री केली जाते. कढीपत्त्याची लागवड करण्याआधी जमिनीत खत टाकून मशागत करावी लागते. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरणी करावी लागते. 8 दिवसातून एकदा कढीपत्त्याच्या पिकांवर फवारणी करावी लागते. बुरशीनाशक, कीटकनाशक या औषधांची फवारणी केली जाते. लागवडीनंतर उत्पन्न मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते, मात्र एकदा उत्पन्न सुरू झालं की मग बक्कळ कमाई होते.
आनंद शेटे 3 एकर बागेत कढीपत्त्याची छाटणी दर 4 महिन्यांनी करतात. दरवेळी कढीपत्त्याला वेगवेगळे दर मिळतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कढीपत्त्याला कधी 50 रुपये, 40 रुपये, 35 रुपये 5 किलो असा दर मिळतो. यातून वर्षाला 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं.
'शेतकऱ्यांनी कढीपत्त्याची लागवड करावी, एकदा कढीपत्ता लावला की त्यातून आपल्याला 10 वर्षे उत्पन्न मिळतं. कढीपत्त्याला मशागत जास्त असल्यानं काही शेतकरी त्याची लागवड करत नाहीत. परंतु कढीपत्त्याच्या लागवडीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकत, असं शेतकरी आनंद शेटे यांनी सांगितलं.