महावितरणने यापूर्वी शेतकऱ्यांसाठी तक्रार नोंदवण्याचे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते.
महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून तक्रार नोंदवणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवरून तक्रार करणे आणि टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवणे. आता यामध्ये आणखी एक सोयीस्कर पर्याय जोडण्यात आला आहे.
मोबाइल अॅपवरून 'सौर पंप तक्रार'
महावितरणचे अधिकृत मोबाइल अॅप सध्या वीज ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. वीज बिल पाहणे, मीटर रीडिंग नोंदवणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची माहिती, वीज चोरीचा अहवाल अशा विविध सुविधांसाठी या अॅपचा वापर केला जातो. यामध्ये आता ‘सौर पंप तक्रार’ हा नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
advertisement
शेतकऱ्यांना या पर्यायावर क्लिक करून त्यांच्या सौर पंपाशी संबंधित तक्रारी सहज नोंदवता येणार आहेत. तक्रार नोंदवताना शेतकऱ्यांना लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर नमूद करणे आवश्यक आहे.
काय तक्रारी करता येतील?
सौर पंप पूर्णपणे बंद पडणे.
सौर पॅनल्सची नासधूस किंवा चोरी.
पंपातून कमी दाबाने पाणी येणे.
सौर ऊर्जा संच कार्यान्वित न होणे.
महत्त्वाची बाब म्हणजे, सौर कृषी पंप संचांसाठी विमा उतरविण्यात आलेला आहे, आणि बसविल्यानंतर पहिले पाच वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार कंपनीची असते.
तीन दिवसांत तक्रार निवारण बंधनकारक
शेतकऱ्यांनी नोंदविलेली तक्रार 3 दिवसांच्या आत सोडवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी कार्यरत असलेल्या जिल्ह्यांमध्ये सेवा केंद्र उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस द्वारे माहिती दिली जाईल.
प्रत्येक विभागावर मंडल अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहणार असून, तक्रारीच्या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्यात येईल. या नव्या डिजिटल सुविधेमुळे शेतकऱ्यांना वेळीच सेवा मिळणार असून, पंप दुरुस्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येणार आहे, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.