कशी आहे ज्ञानज्योती आधार योजना?
सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' राबवली जात आहे. या योजनेचा लाभ इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. अर्ज करण्याची ऑनलाइन मुदत 18 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. पात्र विद्यार्थ्यांना 60,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळू शकते. ही योजना आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम आणि सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे.
advertisement
पात्रता निकष
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणारा विद्यार्थी बारावीनंतरचं शिक्षण घेत असावा. अर्ज करताना त्याच्याकडे किमान 60 टक्के गुणांचं किंवा ग्रेडेशन प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पालकाचं वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी शैक्षणिक संस्था असलेल्या शहर किंवा तालुक्यातील रहिवासी असावा.
अर्ज कसा करावा?
विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज डाउनलोड करून सर्व माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा.
आवश्यक कागदपत्रे
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र, मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला असला पाहिजे. अनाथ विद्यार्थ्यांसाठी महिला व बालकल्याण विभागाचे अनाथ प्रमाणपत्र आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र (40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे) आवश्यक आहे. तसेच, माहिती खरी असल्याचं स्वयंघोषणापत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याचं शपथपत्र, भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.