सोलापूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सरकारी नोकरीचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. सोलापूर शहरातील सलगर वस्ती येथील रिक्षा चालकाचा मुलानं हेच स्वप्न साकार केलंय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षय कंदी हा फौजदार झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. रिक्षा चालकाचा मुलगा ते पोलीस उपनिरीक्षक याच प्रवासाबाबत अक्षयने लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
अक्षय हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील रिक्षा चालक म्हणून काम करतात. तर आई गृहिणी आहे. सोलापुरातील गिरणी बंद पडल्याने गिरणी कामगार असणाऱ्या वडिलांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तर आईने शिवणकाम करून घराचा आर्थिक भार वाहण्यास मदत केली. मुलानं अधिकारी व्हावं हे आई-वडिलांचं स्वप्न होतं. हे स्वप्न आता साकार झालं असून नुकतीच त्याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालीये.
गॅरेजवाल्याच्या दोन्ही लेकी मंत्रालयात अधिकारी झाल्या, संजीवनी-सरोजिनीच्या जिद्दीची कहाणी
2020 साली अक्षयने खाजगी क्षेत्रात नोकरी न करता शासकीय सेवेत रुजू व्हायचा निश्चय केला होता. त्यासाठी दररोज 8 ते 10 तास अभ्यास सुरू होता. स्पर्धा परीक्षा करताना कुणी एकटा अभ्यास करतो, असं नसतं. तर अभ्यास करणाऱ्याचं संपूर्ण कुटुंबच ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगत असतं. जोपर्यंत घरातून खंबीर साथ मिळत नाही तोपर्यंत या क्षेत्रात आपण यश मिळवू शकत नाही. ज्यावेळेस घरातून आर्थिक मानसिक पाठबळ मिळते तेव्हा आपण नक्कीच एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवतो, असं अक्षय सांगतो.
दरम्यान, आई-वडिलांचे व मी मनाशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवल्याने खूप आनंद होत आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये यश मिळवणं खूप कठीण असतं हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे. पण खचून न जाता भरपूर अभ्यास, योग्य ते मार्गदर्शन घेतल्यास या क्षेत्रामध्ये सुद्धा नक्कीच यश मिळेल, असा सल्ला अक्षय कंदी यांनी दिला आहे.