पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सोनिया
उपस्थित कलाकार मित्रांच्या आग्रहाखातर सोनिया परचुरे मंचावर बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यांचे बोलणे ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले. सोनिया म्हणाल्या, "माझे या रंगमंचाशी नाते अतुलमुळेच जुळले. त्यामुळे अतुल नसताना, कोणत्याही थिएटरमध्येही मला अजून जाता आलेले नाही." पण त्यांच्या आठवणींसाठी इतके लोक एकत्र जमले आहेत, हे पाहून खूप चांगले वाटले, असे त्या म्हणाल्या.
advertisement
आपल्या ३० वर्षांच्या वैवाहिक जीवनातील अनुभव सांगताना सोनिया म्हणाल्या, "तीस वर्षांत मी जो अतुल बघितला, आणि आता अतुल नसताना मी जो अतुल बघतेय, तो एक वेगळाच अतुल आहे. त्याच्याविषयी इतके सगळेजण बोलतायत..." यावेळी त्यांनी अतुल आणि त्यांचे मित्र विनय यांचे प्रेमही सांगितले. "विनय म्हणाला की, शेवटची पाच-सहा वर्ष ते एकत्र होते. खरंच आहे. शेवटच्या चार-पाच वर्षांतील मी एकही सिनेमा अतुलबरोबर एकत्र पाहिला नाही; कारण सगळे सिनेमे त्याने विनायबरोबर पाहिलेले असायचे!"
शेवटच्या क्षणीही अतुल यांच्या मनात विचार नाटकाचाच!
आपल्या दोघांमधील संबंधाबद्दल सोनिया यांनी सांगितले की, "आमच्या दोघांत हेच होते की आम्ही एकमेकांचा खूप आदर करायचो." शेवटी सोनिया यांनी एक भावनिक आठवण सांगितली. "अतुल जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता, तेव्हा तो सतत म्हणत होता की, 'सुनीलला तू नाटकाबाबत सांगितले आहेस ना?'" यावरून अभिनयासाठी आणि रंगमंचासाठी अतुल यांच्या मनात किती तळमळ होती, हे दिसून येते.