प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.या पोस्टमध्ये ती लिहते की, आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पूणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दु:खद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरूवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. भेटूयात,असे तिने चाहत्यांना उद्देशून म्हटलं आहे.
advertisement
सिनेमाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
'मनाचे श्लोक' या शीर्षकामुळे हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या जात आहेत, असा आरोप करत हिंदु जनजागृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पवित्र नावाचा वापर करून लिव्ह-इन संबंधांवर आधारित चित्रपट बनवणे हा समर्थ रामदास स्वामींचा अपमान आहे, अशी त्यांची भूमिका होती. या याचिकेवर सुनावणी करताना माननीय उच्च न्यायालयाने मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आणि प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचे जाहीर केले. चित्रपट प्रदर्शित करण्याचा न्यायालयाचा निर्णय 'मनाचे श्लोक' टीमने प्रसिद्धीपत्रक काढून स्वागत केला.
न्यायालयाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला असला तरी, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध काही थांबलेला नाही. चित्रपटाच्या शीर्षकावरून असलेल्या आक्षेपामुळे, गुरुवारी संध्याकाळी पुण्यात कोथरूड येथील एका थिएटरमध्ये 'मनाचे श्लोक'चा प्रिमीयर शो सुरू होताच, हिंदुत्ववादी संघटनांनी थिएटरमध्ये धडक मारली. त्यांनी थेट चित्रपट निर्मात्यांवर हल्लाबोल करत हा शो जबरदस्तीने बंद पाडला. लिव्ह-इन रिलेशनवरच्या सिनेमाला 'मनाचे श्लोक' हे नाव देऊन समर्थ रामदास स्वामींचा अपमान केला जात आहे, अशी संतप्त भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर पुण्यातील या चित्रपटाचे सर्व शो बंद पाडण्यात आले होते.