अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत “जेव्हा जेव्हा मराठा लढतो, तेव्हा तेव्हा इतिहास घडतोच” असं लिहिलं. तसेच “विजय हा स्वाभिमानाचा, महाराजांच्या मावळ्यांचा” असं म्हणत तिनं मराठा समाजाचे अभिनंदन केलं.
जरांगे पाटील यांच्या या उपोषणाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. यामुळे दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवावा लागला. अखेर मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सदस्य शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे आदींनी आझाद मैदानात येऊन जरांगे यांची भेट घेतली.
advertisement
यावेळी सरकारतर्फे हैदराबाद आणि सातारा संस्थानचे गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला. तसंच, आंदोलनादरम्यान नोंदवण्यात आलेले सर्व गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचे आश्वासनही देण्यात आले. हा निर्णय वाचून दाखवल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना खुलेपणाने विचारणा केली आणि सर्वांच्या सहमतीनंतर त्यांनी लिंबूपाणी पिऊन उपोषण संपवले.
Prajakta Gaikwad
सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या या समझोत्यामुळे मराठा समाजात उत्साहाचं वातावरण आहे. राज्यभर ठिकठिकाणी गुलाल उधळून, फटाके फोडून आणि बॅंडबाजासह आनंद व्यक्त करण्यात आला.