शाहरुखने पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
शाहरुख खानच्या मीर फाउंडेशनने स्थानिक एनजीओसोबत हातमिळवणी करून पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचा घाट घातला आहे. या उपक्रमांतर्गत गरजेच्या रिलीफ किट्सचे वाटप केले जात आहे. ज्यामध्ये औषधे, स्वच्छतेसंबंधी वस्तू, अन्नपदार्थ, मच्छरदाणी अशा अनेक आवश्यक वस्तू समाविष्ट आहेत. ही मदत अमृतसर, पटियाला, फाजिल्का आणि फिरोजपूर या जिल्ह्यांतील एकूण 1500 कुटुंबांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. लोकांना त्वरीत आरोग्य, सुरक्षितता आणि निवाऱ्याची गरज भागवता यावी, जेणेकरून पूरग्रस्त कुटुंबांना पुन्हा एकदा आपले जीवन सुरळीत करता यावे, हा यामागचा उद्देश आहे.
advertisement
मीर फाउंडेशन कोणासाठी काम करते?
किंग खानच्या मीर फाउंडेशनचा मुख्य उद्देश अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर आणि महिला सशक्तीकरणासाठी आहे. मात्र समाजात जेव्हा कुणालाही मदतीची गरज भासते, तेव्हा हा अभिनेता नेहमीच पुढे येतो. कोरोनाकाळातली मीर फाउंडेशनने ऑक्सिजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड, तसेच राशन आणि आर्थिक मदत पुरवली होती. आता या फाउंडेशनने पूरपीडित कुटुंबांना मदत केली आहे.
आतापर्यंत पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मदत पोहोचवली आहे. सलमान खान, सोनू सूद, दिलजीत दोसांझ, शहनाज गिल, हरभजन सिंह आणि इतर अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानच्या Being Human संस्थेने पंजाबला पाच रेस्क्यू बोट पाठवल्या आहेत.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान मनोरंजनसृष्टीत जेवढा सक्रीय आहे तेवढाच तो सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. आजवर त्याने अनेकदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पण आता पहिल्यांदाच किंग खानला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 'जवान' या चित्रपटासाठी अभिनेत्याला हा पुरस्कार मिळणार आहे. 23 सप्टेंबर 2025 रोजी हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.