कोल्हापूर : बऱ्याच वेळेला शरीरात आपल्याला चरबीच्या गाठी पाहायला मिळतात. मात्र ती गाठ कॅन्सरची तर नाही ना ही भीती देखील मनात येऊन जाते. अशावेळी चरबीची सामान्य गाठ आणि कॅन्सरची गाठ यामधील फरक लक्षात येणे गरजेचे असते. त्यासाठीच कॅन्सरच्या गाठीविषयी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी माहिती दिली आहे.
advertisement
शरीरातील गाठींमध्ये सामान्यतः स्तनांमधील चरबीच्या गाठींबद्दल लोकांना संभ्रमावस्था असते. अशा गाठी ओळखून त्यांचे निदान करून पुढे त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणेच हिताचे ठरते. कॅन्सरच्या गाठीचे निदान होण्यास तितका वेळ लागेल तितकाच कॅन्सरचा धोका जास्त वाढत जातो, असे डॉ. रेश्मा पवार यांनी सांगितले आहे.
ही उपचार पद्धती ठरतेय कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान, डॉक्टरांनी सांगितली सविस्तर माहिती, Video
कशी ओळखावी कॅन्सरची गाठ?
शरीरातील कॅन्सरची गाठ ही आपल्याला सहज ओळखता येऊ शकते. शरीरातील एखादी गाठ खूप कडक असेल, अनियमित असेल किंवा तीचा आकार अचानक वाढत असेल, तर ती कॅन्सरची गाठ असू शकते. अशावेळी वेळ न दवडता डॉक्टरांना दाखवून घेणे आवश्यक असते. डॉक्टर रुग्णाच्या शरीरातील ती गाठ फाईन नीडल एस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सी करुन तपासून पाहतात. फाईन नीडल एस्पिरेशन सायटोलॉजीमध्ये सुईच्या मदतीने त्या गाठीच्या पेशी तपासण्यासाठी काढल्या जातात. तर बायोप्सीमध्ये त्या गाठीच्या तुकडा तपासणीसाठी काढला जातो. यावरुन ती गाठ कॅन्सरची असल्याचे निदान लावले जाते, अशी माहिती डॉ. रेश्मा पवार यांनी दिली आहे.
तपासणीनंतर पुढे काय?
एफएनएसी किंवा बायोप्सी यांच्यामदतीने कॅन्सरची गाठ ओळखल्यानंतर उपचारांच्या दृष्टीने डॉक्टर अजूनही काही तपासण्या करुन घेतात. यावरून रुग्णाच्या कॅन्सरच्या स्टेजची माहिती मिळते. त्यानंतर डॉक्टर उपचार सुरू करतात. यामध्ये शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन उपचार किंवा केमोथेरपी किंवा सर्व उपचार पद्धती एकत्रित रित्या वापरल्या जातात, असे डॉ. पवार यांनी सांगितले आहेत.
दुर्लक्ष बेतू शकतं जीवावर, ही लक्षणे असतील तर त्वरीत करा 'टीबी'ची चाचणी, Video
निदानास वेळ लागल्यास किती वाढतो धोका?
कॅन्सरची गाठ ओळखण्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होण्यापर्यंत रुग्णाला जितका जास्त वेळ लागेल तितकाच रुग्णाचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे एखाद्या गाठी बद्दल शंका असेल तर त्वरित डॉक्टरांना ती दाखवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जर पहिल्या टप्प्यात कॅन्सरचे निदान झाले, तर रुग्ण जगण्याची शक्यता 95 टक्के आहे. दुसऱ्या टप्प्यात ही शक्यता 95 टक्क्यांवरुन 70 ते 65 टक्क्यांवर येतो. तिसऱ्या टप्प्यात जर कॅन्सरचे निदान झाले तर हीच शक्यता 40 टक्क्यांपर्यंत येते आणि चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निदानात रुग्ण वाचण्याची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के होते, असे डॉक्टर रेशमा पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सध्या कॅन्सरवर प्रभावी औषधोपचार करता येणे शक्य आहे. त्यामुळे जितक्या लवकर या आजाराची चिन्हे आपल्याला जाणवतील, तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन देखील डॉक्टर पवार यांनी केले आहे.