थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी गावोगावी जाऊन ग्राहकांशी संपर्क साधत आहेत. अनेक ठिकाणी ग्राहक वीजबिल भरण्यास सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. मात्र, काही ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विरोध, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार 2 ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
वाहन धारकांसाठी दिलासादायक बातमी, HSRP नंबर प्लेट जागेवर बसवणार, 'ही' आहे अट
वीजबिल वसुली मोहिमेत जनमित्र अर्थात महावितरणचे वायरमन महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते गावागावांत जाऊन ग्राहकांना त्यांच्या थकीत बिलाबाबत माहिती देत आहेत आणि वीजबिल भरण्याचे महत्त्व पटवून देत आहेत. त्यांच्या समुपदेशनामुळे अनेक ग्राहक थकबाकी भरत आहेत. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात वसुली बाकी असल्याने महावितरणने जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून 32 कोटी 38 लाख रुपये तसेच पथदिवे आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे 3 कोटी 52 लाख रुपये असे एकत्रित 35 कोटी 90 लाख रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वसुली झाली असली तरी 9 कोटी 68 लाख रुपयांची वसुली शिल्लक आहे. येत्या 10 दिवसांत उर्वरित वसुली पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे.
ग्राहकांनी महावितरणच्या वेळेवर वीजबिल भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर, मोबाइल अॅपवर किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






