साजापूर परिसरातील 17 वर्षीय यश (नाव बदलले) हा 9 जानेवारी रोजी करोडी शिवार परिसरात कार चालवत होता. तेव्हा त्याने वेगात जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पहिलं प्रेम जीवावर उठलं, ‘तो’ कोयता घेऊन कॉलेजला आला अन्..., मुंबईच्या घटनेनं खळबळ
advertisement
या घटनेनंतर करण्यात आलेल्या तपासात आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये समोर आले की, संबंधित कार शेख लतिफ शेख अब्दुल रहेमान (वय 56) यांच्या मालकीची होती. त्यांनी 16 डिसेंबर 2025 रोजी ती कार नंदनवन कॉलनीतील विजय गनराज यांना विकली होती. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी ही व्यवहार प्रक्रिया पूर्ण झाली. पुढे 9 जानेवारी रोजी हीच कार ऋषिकेश येवतकरकडे होती आणि त्याने आपल्या परिचयातील अल्पवयीन यशला ती चालविण्यास दिली. त्यातून हा अपघात झाला आणि यशचा जीव गेला.
या प्रकरणात शासनाच्या वतीने पोलिस अंमलदार विठ्ठल खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऋषिकेश येवतकर तसेच संबंधित प्रकरणात यशविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.
कोणते गुन्हे दाखल?
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 106(1) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), कलम 281 (सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे), तसेच कलम 324(4) (आगळीकता) आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत कलम 5/180 (परवाना नसलेल्या किंवा अल्पवयीन व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे) यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कलमान्वये दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यासोबतच संबंधित वाहनाची नोंदणी निलंबित करण्याची तरतूदही आहे.






