आशा ढाकरके या पती दिलीप ढाकरके आणि मुलगी नेहा यांच्यासोबत उपचार घेऊन दुचाकीवरून (एमएच 20 सीडी 7460) घरी परतत होत्या. ओअॅसिस चौकात सिग्नल लाल झाल्याने दिलीप यांनी दुचाकी थांबवली. त्याच क्षणी पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एमएच 46 बीयू 2398) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की आशा ढाकरके थेट कंटेनरच्या चाकाखाली आल्या. काही क्षणांतच त्यांच्या जीवनाचा अंत झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आणि अवघा परिसर सुन्न झाला.
advertisement
दीड लिटर रक्तस्राव, गर्भवतीची मृत्यूशी झुंज, शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, 30 मिनिटांत...
पत्नीची अशी अवस्था पाहून दिलीप ढाकरके पूर्णपणे कोलमडून गेले. मात्र, अशा भयाण प्रसंगातही त्यांची 18 वर्षांची मुलगी नेहा डगमगली नाही. तिने प्रथम रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईचा श्वास तपासला. आई आता नाही, हे कळताच ती कोसळली नाही. तर आईचा हात हातात धरत तिने वडिलांना घट्ट मिठी मारली आणि अश्रूंमध्येही धीर देत म्हणाली, “बाबा, मी आहे ना…” हा क्षण पाहून तेथे जमलेल्या शेकडो नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
काहीजण मोबाईलने फोटो काढत असताना, नेहाने त्यांना हात जोडून विनंती केली. “फोटो नका काढू… माझ्या आईला रुग्णालयात घेऊन चला…” आईचा देह डोळ्यांसमोर छिन्नविच्छिन्न होत असतानाही, अवघ्या 18 वर्षांच्या मुलीने दाखवलेला संयम आणि धीर पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.
कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघातानंतर कंटेनर चालक अमोल सोमीनाथ वारे हा वाहन सोडून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश यादव आणि हवालदार अरुण फोलाने यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून आशा ढाकरके यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी नेहा ढाकरके हिच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबाचा आधार गेला
आशा ढाकरके या एका कंपनीत कष्टकरी कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. त्यांच्या पश्चात पती दिलीप ढाकरके आणि चार मुली असा परिवार आहे. आईच्या अचानक जाण्याने हे संपूर्ण कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. कंटेनर पोलिस ठाण्यात आणण्यात आला. मुलीच्या डोळ्यांसमोरच आईचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील अवजड वाहनांच्या बेदरकारपणावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.






