मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आतापर्यंत 975 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीनं काहींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक भागांत हेलिकॉप्टरद्वारे NDRF बचावकार्य करत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
advertisement
मंत्री आणि पालकमंत्र्यांनी उद्यापासून पूरग्रस्त भागांची तातडीनं पाहाणी करावी अशी सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सरसरीच्या 105 टक्के पाऊस झाला आहे. तातडीनं शेतकऱ्यांना मदत करणार असून मृत्यूच्या घटनांमध्ये मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर दिले आहेत. तर जनावरं आणि इतर नुकसान जे झालं आहे तेही जिल्हा स्तरावर मदत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यांनी पुढे म्हटले की, आजच्या बैठकीत कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती याचा आतापर्यंत संपूर्ण आढावा घेतला. उद्या पालकमंत्र्यांना तातडीनं परिस्थिती पाहाणी करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करण्याची प्रक्रिया आताही सुरू आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली जात आहे. जेवढ्या पद्धतीची मदत करावी लागेल ती केली जात आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील मदत करण्यात येते.
केंद्राची मदत मिळणार?
केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी करणार का, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की केंद्राकडून मदत यायला वेळ लागतो. सगळ्या नुकसानीचा अहवाल एकत्रितपणे पाठवला जातो. त्यानंतर मदत मिळते. मात्र, तोपर्यंत आपल्याला NDRF च्या अंतर्गत आपल्याकडे काही निधी आधीच मिळाला असतो. त्या निधीचा वापर करता येईल. केंद्र सरकारकडून मदत निश्चित घेऊ, मात्र त्यासाठी आम्ही थांबणार नाही. आता शेतकऱ्यांना जी मदत लागेल त्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.