डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाची विक्री करू नका, असे आदेश एफडीएने औषध विक्रेत्यांना दिले आहेत. याबाबतची माहिती राज्य औषध नियंत्रक डॉ. डी. आर. गव्हाणे यांनी दिली. बाल मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या 'कोल्ड्रिफ सिरप'च्या साठ्यावर महाराष्ट्राच्या एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या औषधात 'डायइथिलीन ग्लायकोल' हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
त्यामुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, वितरक आणि रुग्णालये येथे तपासणी सुरू केली आहे. विषारी कफ सिरपचा साठा आढळल्यास तो गोठवावा आणि त्वरित नष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. राज्यातील अधिकारी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत.
मुंबई-ठाण्यात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री
मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील अनेक औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री होत असल्याचा दावा ऑल फूड ड्रग व लायसन्स होल्डरम फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. बुधवारी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मुंबई- ठाणे- कल्याणमधील अनेक औषध विक्रेत्यांकडे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्यांच्या औषधांची खरेदी केली. यावेळी बहुतांशी विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीची विचारणा न करताच त्यांना खोकल्याच्या औषध देण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बिलही दाखवले.
तमिळनाडूत घातक सिरपचा कारखाना सील
बाल मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या 'कोल्ड्रिफ सिरप'च्या तामिळनाडूमधील कारखान्यावर मध्यप्रदेशच्या एसआयटीने छापेमारी केली. कांचीपुरम जिल्ह्यातील सुंगुवरचत्रम येथे श्रीसम फार्मास्युटिकल्सचा कारखाना आहे. एसआयटी पथकाने हा कारखाना सील केला. तेलंगणाच्या औषध नियंत्रण प्रशासनाने गुजरातमध्ये उत्पादित होणऱ्या रिलीफ व रेस्पिफ्रेश या दोन कफ सिरपच्या वापरावर बंदी घातली आहे.