मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहगड रोडवरील फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील २.५ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेली सुनावणी, न्यायालयाने सरकारला दिलेले निर्देश, जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा होत नसलेला संवाद, आंदोलकांमुळे मुंबईत उद्भवलेली परिस्थिती आदी विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मते व्यक्त केली.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आरोपांचे खंडन
सरकारनेच मराठ्यांचे खाण्यापिण्याचे हाल व्हावेत म्हणून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवायला लावली, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आंदोलनकर्त्यांनी धुडगूस घातल्यानेच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती, संतापून व्यापारी निघून गेले. त्यानंतर सरकारकडूनच आम्हाला उपाशी ठेवण्याचे प्रयत्न झाले, असे आरोप लावण्यात आले. परंतु आम्ही व्यापाऱ्यांना पोलीस कुमक देतो, दुकाने सुरू ठेवा, असे सांगितल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. आम्ही किंवा कुणीही व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवायला सांगितले नाही, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांनी आरोप खोडून काढला.
आंदोलकांचे वर्तन भूषणावह नाही- मुख्यमंत्री फडणवीस यांची नाराजी
मागील काही वर्षांपूर्वी निघालेल्या मराठा मोर्चाची शिस्त महाराष्ट्र राज्याने आणि देशाने पाहिली आहे. मोर्चाची शिस्त पाहून आणि संवेदनशीलता पाहून सरकारने सकारात्मक पद्धतीने निर्णय घेतले. माझ्या पहिल्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी निर्णय घेतले. परंतु आत्ताच्या आंदोलनामधून आंदोलकांचे वर्तन भूषणावह नाही, अशी नाराजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवली.
फडणवीस यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना जशास तसे प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील एका व्हिडीओचा संदर्भ देऊन सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणे बंद करा. खरे तर त्यांनी स्वत:ला विचारले पाहिजे की हा प्रश्न का चिघळला? सत्तेत असताना त्यांच्या पक्षाने यावर उत्तर शोधले का? अडीच वर्षांच्या काळात त्यांनी काही निर्णय घेतले का? असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना दिले.