मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची निवडणूक पार पडणार आहे. बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीला यंदा चांगलीच राजकीय रंगत आली आहे. भाजपा पुरस्कृत आमदार प्रसाद लाड यांच्या पाठबळावर असलेले ‘सहकार समृद्धी’ पॅनल आणि बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या युतीमध्ये थेट लढत असणार आहे. दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी ची निवडणूक येत्या 18 ऑगस्टला होणार आहे एकीकडे बेस्ट महाव्यवस्थापकांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांमध्ये गोंधळ पाहायला मिळाल्यानंतर आता बेस्टच्या पतसंस्थेच्या बाबतीत राजकीय रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या पतसंस्थेवर मागील दोन दशके शिवसेनेची सत्ता आहे. आता, शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या कामगार संघटना उत्कर्ष पॅनल म्हणून ही निवडणूक एकत्रित लढणार आहेत. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा आहेत. तर, आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिवसेनेचे (शिंदे) माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृध्दी पॅनलची निर्मिती केली आहे.
ठाकरे गटावर भाजपचा हल्लाबोल, फडणवीसांच्या गॅरंटीवर मैदान मारणार?
पतसंस्थेच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे पॅनल आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या गॅरंटीवर निवडणूक लढवणार असल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बेस्ट कामगारांना भरभरून दिले असल्याचे म्हटले आहे. प्रसाद लाड यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना एकूण 52 कोटी रुपयांचा कोविड भत्ता अखेर मंजूर झाला. त्यापैकी 50 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित रक्कम दिवाळीपर्यंत मिळणार आहे. कामगारांच्या खात्यात थेट 10 ते 16 हजार रुपये कोविड भत्त्याच्या रूपाने जमा झाले. लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक रक्कम 22,574 कर्मचाऱ्यांना मिळाली असून, सर्वात कमी रक्कम 10 हजार इतकी आहे. विशेष म्हणजे 19,408 कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कोविड भत्ता मिळाल्याची नोंद आहे.
प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र निशाणा साधला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने देण्यात आली होती. पण देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे आणि देवाभाऊंसारख्या खऱ्या मित्राच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे हा भत्ता शक्य झाला. बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील बीडीडी चाळीतील रहिवाशांप्रमाणे 500 चौफूटांचे घर देण्यात येणार असल्याचे सांगितले.
