धाराशिव: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले. काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र होते. तर या धोधो पावसामुळे अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
नुकसान अन् दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तीन आठवडे उघडीप दिलेल्या पावसाने आज सकाळपासून जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. या पावसाने ऊस, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला. मात्र, काढणीला आलेल्या उडीद आणि मूग या पिकांना मोठा फटका बसणार आहे.
काळजी घ्या! पुढील 2 दिवस धोक्याचे, विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
एकाच पावसात नद्या दुथडी
धाराशिव जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आलाय. कळंब तालुक्यातून वाहणारी तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागलीये. त्यामुळे दहिफळ आणि परतापूर या दोन गावांचा संपर्क तुटला. पुलावरून पाणी वाहत असल्याने शेतात गेलेल्या नागरिकांना घराकडे येण्याचा मार्ग बंद झाला. बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांची खंदे मळणी करण्यासाठी शेतात गेलेले शेतकरी शेतातच अडकले.
दरम्यान, दिवसभर लागून राहिल्याला या पावसामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक असल्याचं मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या पावसाने हाताशी आलेली पिके वाया जाण्याचा धोका असल्याचं शेतकरी संदिपान कोकाटे म्हणाले.