कल्याण ग्रामीण भागात लोढा क्राऊन तळोजा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आयोजित करण्यात आली होती. ही निवडणूक रविवारी मोठ्या वादात पार पडली. नियमाप्रमाणे निवडणुकीसाठी मानपाडा पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त सोसायटी आवारात लावण्यात आला होता. ऑर्चिड विकास पॅनल आणि ऑर्चिड विश्वास पॅनल या दोन्ही विरोधी पॅनलमध्ये ही निवडणूक होत होती. सकाळपासून दुपारपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदान अंतिम टप्प्यात आलं असताना दोन्ही गटाच्या उमेदवारांमध्ये सायंकाळी 4 च्या दरम्यान बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.
advertisement
मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये 7 जणांविरोधात गुन्हे दाखल
दरम्यान, या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबतची बातमी news18 लोकमतने दिली होती. अखेरीस याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वेश पावसकर, महेश ठोंबरे, अल्पेश शेंद्रे, वेदप्रकाश तिवारी, दिपक आव्हाड, राहुल आंग्रे, धिरेंद्र मिश्रा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच महेश ठोंबरे, अल्पेश शेंद्रे, धिरज शुक्ला आणि राकेश शिंदे यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
पोलिसांना मारहाण होऊनही अदखलपात्र गुन्हा
वाद सोडवण्यासाठी कर्तव्यावर असलेले पोलीस मध्ये पडले असता त्यांना सुद्धा धक्काबुक्की मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार गणेश गित्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महेश ठोेबरे, राकेश शिंदे, अल्पेश शेंद्रे, धिरज शुक्ला यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खोणी पलावा येथील आर्चिड सोसायटीमध्ये निवडणूक बंदोबस्तात गित्ते यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक माघाडे, पोलीस हवालदार थोरात, ठिकेकर, पोलीस शिपाई आवारी, खरात, बेंडके आणि बिट मार्शल क्रमांक ७ चे पोलीस नाईक आव्हाड हे कर्तव्यावर होते. निवडणुकीच्या किरकोळ कारणावरुन दोन्ही पॅनलमध्ये वाद झाले.
विरोधकांना झटापट करण्यापासून वाचवताना महेश ठोंबरे, राकेश शिंदे, अल्पेश शेंद्रे, धिरज शुक्ला यांनी पोलिसांना अरेरावीची भाषा करुन अटकाव केला. पोलिसांना अरेरावीची भाषा करुन शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केलं म्हणून तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांना मारहाण होऊनही अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून पोलिसांवर कोणाचा दबाव आला आहे का? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे.