आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणार आहेत. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून आयोजित करण्यात आलेली ही सलग दुसरी मंत्रिमंडळ बैठक आहे, ज्याला शिंदे उपस्थित राहणार नाहीत. या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नेमकं कारण काय?
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जावळी येथे जाहीर प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार सभांना संबोधित करण्यासाठी शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीऐवजी पक्षाच्या प्रचाराला प्राधान्य दिल्याचे समजते.
advertisement
राजकीय चर्चेला उधाण का?
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी गटात सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सलग दोन महत्त्वाच्या बैठकींना उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजर राहणे, हे केवळ निवडणुकीचे व्यस्त वेळापत्रक आहे की त्यामागे काही राजकीय नाराजी दडली आहे? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निकालानंतरच्या समीकरणांमुळे मंत्रिमंडळात काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असतानाच शिंदेंची अनुपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांवर लक्ष
महापालिकांमधील यशानंतर आता महायुती आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्यामुळे जावळी येथील सभेतून शिंदे काय भूमिका मांडतात आणि विरोधकांवर काय टीका करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एककीकडे मंत्रिमंडळात राज्याच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री मैदानात उतरून पक्षाची ताकद वाढवताना दिसत आहेत. राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने काही महापालिकांमध्ये चांगेलच यश मिळवले. त्यानंतर आता त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
