शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंविरोधात दोन हात करण्यासाठी चांगलीच कंबर कसली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध होत त्यांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. ठाकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबईत त्यांना धक्का देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरू केली. शिवसेना ठाकरे गटाला भगदाड पाडण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेले जवळपास 50 नगरसेवक एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे खेचले आहेत. यामध्ये ठाकरेंच्या विश्वातील काही जण आहेत. त्याशिवाय, ठाकरे गटाचे पदाधिकारीदेखील आपल्याकडे खेचले आहेत.
advertisement
एकनाथ शिंदेच फसले?
भाजपच्या सोबतीने मुंबई महापालिकेतून ठाकरेना सत्तेतून खेचण्यासाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदेंनी जागा वाटपात आपला वरचष्मा राहावा यासाठी रणनीती आखली आहे. शिंदे यांच्याकडे सध्या 100 हून अधिक माजी नगरसेवकांचे बळ आहे. त्यामुळे जागा ते भाजपकडे वाटपात समसमान जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे भाजपने मुंबईत 227 पैकी 150 जागांची तयारी सुरू केली आहे.
ठाकरेंना शह देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात इनकमिंग झाले. त्यासाठी मोठमोठी आश्वासने दिल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पदाधिकार्यांची घोषणा केली. या घोषणेनंतर एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी चांगलीच वाढली. पक्षाने नुकतीच प्रभारी विभागप्रमुखांची यादी जाहीर केली असून, या यादीत संधी न मिळाल्याने अनेक इच्छुक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना फोडल्यानंतर होणारी ही पहिली मुंबई महापालिका निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मुंबईतील ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. अनेकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेचे नेतृत्व मान्य केले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाकडून विभागप्रमुखांच्या नेमणुका करण्यात आल्या. मात्र यादी जाहीर होताच, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देताना दिलेला शब्द शिंदे गटात पाळला गेला नसल्याची खंत काहींनी व्यक्त केली आहे,
शिवडीत मोठा उद्रेक?
भाजपकडून निलंबित करण्यात आलेले नाना अंबोले यांची शिवसेनेच्या विभागाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळली आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेचे तब्बल 80 टक्के पदाधिकारी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी लवकरच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. "आम्हाला वर्षानुवर्षे दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करून बाहेरून आलेल्या व्यक्तींना वरचढ पदे दिली जात आहेत," अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. नाना आंबोले हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. 2017 च्या निवडणुकीत पत्नीला उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. निवडणुकीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर नाना आंबोले यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
इनकमिंगवाले वेट अॅण्ड वॉचवर?
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटातून आऊटगोईंग मोठ्या प्रमाणावर बंद झाले. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय फेरफार होऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्यानंतर निभाव लागण्यावर काहींच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
एकनाथ शिंदेंची कसोटी...
मुंबईतील नाराजीवर तोडगा काढताना एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे. अनेकांनी आश्वासनांवर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील नाराजी दूर करताना शिंदे यांना ठाण्यातील होम ग्राउंडवरही भाजपच्या आव्हानांचा मुकाबला करायचा आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्याचा मोठा फटका हा शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे गेलेली मराठी मते हे ठाकरे बंधूंकडे वळणार असल्याचा अंदाज आहे.