पिढ्यानपिढ्या मराठवाड्याच्या वाट्याला दुष्काळ आला. पाण्याची वाणवा असल्याने रोजगारासाठी स्थलांतरितांचे जगणे अनेकांच्या वाट्याला आले. त्यामुळे मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचा मुद्दा गाजत असतो. आत्ता कुठे पारंपारिक वाट सोडून मराठवाडा कूस बदलू पाहत होता. मात्र यंदाच्या पावसाने मराठवाड्यावर आभाळ कोसळले. शेतजमीन खरडून गेली, पिकांचे मोठे नुकसान झाले. पशुधन वाहून गेले. शेतात मातीही उरली नाही. अशा स्थितीत नियम, अटी शर्ती बाजूला ठेवून मदत सरकारने मदत करायला हवी, अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतली.
advertisement
शिंदेंचा मंत्री म्हणाला, भाई CM असताना जसे निर्णय व्हायचे...
विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारमधील पक्षांमध्येच चढाओढ आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अतिवृष्टीकाळात शेतकऱ्यांना जशी भरघोस मदत करण्यात आली होती, तशी मदत आत्ता झाली पाहिजे, असे म्हणत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जाहीर मदत पुरेशी नसल्याचेच सूचित केले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा दाखला देऊन त्यांच्यावर आलेले संकट अधोरेखित करून शिवसेना पक्षाने बळीराजाच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणल्याचे चित्र आजच्या कॅबिनेट होते.
सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण
सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाल्याने शेतकऱ्यांचा त्यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड रोष आहे. दुसऱ्या बाजूला संकटातली संधी हेरून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने तत्काळ आपत्तीग्रस्त भागांत मदत पोहोचवल्याने त्यांच्याविषयी सहानुभूतीचा सूर लोकांमध्ये आहे. हेच ओळखून शेतकऱ्यांच्या मनात शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उजळविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बळीराजाच्या बाजूने आग्रही भूमिका घेण्याचे ठरवले आहे. यामधून ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करतील. एकंदर सरकारमधील पक्षांची आपणच बळीराजाचे तारणहार आहोत, हे दाखविण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे.