नाशिक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला सुरू असलेली गळती कायम आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, विलास शिंदे यांनी भाजप आणि शिंदे गटात शक्तिप्रदर्शन करत प्रवेश केला. मात्र, त्यापूर्वीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, यामुळे शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला होता.
advertisement
मागील एक महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरेंची सेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात पुरती पडझड झाली आहे. सुरुवातीला सुधाकर बडगुजर त्यानंतर विलास शिंदे आणि आता गणेश गीते आणि सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशाने नाशिक मधील ठाकरेंच्या शिवसेनेची बिकट अवस्था झाली आहे. भाजपच होणाऱ्या या पक्षप्रवेशावर ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार हल्लाबोल केला आहे. खोटे गुन्हे दाखल करणे आणि त्यातून दबाव निर्माण करत हे प्रवेश घडवून आणले जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेने केला आहे.
काँग्रेस-पवार गट हाफ, ठाकरे साफ
भाजप आणि शिंदे सेनेत झालेल्या या इनकमिंग मुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे 35 पैकी केवळ 4 नगरसेवक तर काँग्रेसचे 5 पैकी 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 6 पैकी केवळ 3 नगरसेवक शिल्लक राहल्यानं नाशिक मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था झाली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या पक्षांसमोर सत्ताधारी पक्षाने मोठं आव्हान उभं केलं आहे.
संजय राऊतांचा आरोप
नाशिक मधील या पक्षफोडीवर संतप्त झालेल्या संजय राऊत यांनीही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला,भाजप डी गँग झाली डरपोक गँग झाली असून भाजपात दाऊद इब्राहिम आणि पहलगाम हल्ल्यातील फरार दहशतवाद्यांना देखील प्रवेश दिला जाईल असा गंभीर आरोप केला.
ठाकरे यांच्या सेनेकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर नाशिक मध्ये गुन्हा दाखल असलेले सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा प्रवेश पुढे ढकलत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीते ठाकरेंच्या सेनेतील प्रशांत दिवे सीमा ताजणे यांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला या वेळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी या सगळ्या आरोपावर प्रतिक्रिया देताना येणाऱ्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या पक्षाचा एकही कार्यकर्ता राहणार नाही तर सर्वच पक्षांमधील मोठे पक्ष प्रवेश आपल्याला येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळेल असा पलटवार केला. आता ठाकरे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडी हे आव्हान कसं पेलणार आणि ही गळती रोखण्यसाठी काय व्यूहरचना कशी आखणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.