मुक्ताईनगर, 6 नोव्हेंबर : महाराष्ट्रात झालेल्या 2,359 जागांसाठी झालेल्या निवडणुकींचा निकाल यायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांचा गड मानला गेलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या 4 पैकी 3 जागांवर शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या मंदाकिनी कोळी, वडवे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे शिवराम कोळी, चिखली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वैभव पाटील सरपंचपदी विराजमान झाले आहेत. पिंपरी नांदू ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे समर्थक प्रतिभा अशोक पाटील सरपंच झाल्या आहेत.
जामनेर तालुक्यातील 17 पैकी 17 ग्रामपंचायतींवर गिरीश महाजन यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं, त्यामुळे इकडेही एकनाथ खडसे यांना धक्का लागला.
(सुप्रियाताईंना आपल्याच मतदारसंघात धक्का, अजितदादांनी उधळला गुलाल )
जळगाव जिल्ह्यातल्या एकूण 173 ग्रामपंचायतींपैकी 48 ठिकाणी भाजपचा, 43 ठिकाणी शिंदे गटाचा, 10 ठिकाणी अजित पवार गटाचा, 6 ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचा, 3 ठिकाणी काँग्रेसचा, 14 ठिकाणी शरद पवार गटाचा विजय झाला, तर 11 ग्रामपंचायतींवर इतर विजयी झाले.
जळगावच्या यावल तालुक्यात 11 ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचं आणि 3 ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकवला. शरद पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावं लागलं आणि एका जागेवर अपक्ष विजयी झाला.
मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या अमळनेरमध्ये चुरशीशी निवडणूक पाहायला मिळाली. अमळनेर तालुक्यातील एकूण 14 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतीवर मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून बाहेर पडल्यानंतरही मंत्री अनिल भाईदास यांचे बालेकिल्ल्यात वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
